नारायण जाधव ट्रस्टचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
रासायनिक रंग वापरून आपल्या आणि इतरांच्या त्वचेला हानी पोहोचविण्यापेक्षा रंगीबेरंगी फुलांच्या पाकळय़ांची उधळण करून नारायण जाधव ट्रस्टतर्फे रंगपंचमी साजरी करण्यात आली. गेल्या वर्षापासून ट्रस्टतर्फे अनोख्या व अभिनव पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते.
यंदासुद्धा खासबागच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ही रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी शहापूर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर राघवेंद्र हवालदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ट्रस्टचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि स्वागतार्ह असल्याचे सांगून शहरामध्ये अशा तऱहेने रंगोत्सव साजरा करणाऱया संस्था आणि मंडळांची संख्या वाढायला हवी, असे सांगितले. ट्रस्टतर्फे माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी या रंगोत्सवाचा हेतू स्पष्ट केला. कोणालाही हानी न पोहोचता मोठय़ा आनंदाने रंगपंचमी साजरी करावी हा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी गोपाळ बिर्जे, रवि साळुंखे, सुधीर कालकुंद्रीकर, मनोहर होसुरकर, नेताजी देसुरकर, अर्जुन देमट्टी, यल्लाप्पा कोलकार, श्रीधर जाधव, रमेश सोनटक्की, अशोक चिंडक, पी. जी. घाडी, विजय जाधव, संजय किल्लेकर, सतीश शिंदे, साईराज जाधव, तुषार हलगेकर, दिनेश मेलगे, सुभाष शिनोळकर, प्रदीप शट्टुप्पाचे, दिलीप दळवी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.