ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आलेल्या फेसबुक, इन्स्टाग्रामसह 89 इतर ॲप्सविरोधात लेफ्टनंट कर्नल चौधरी यांनीदाखल केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड करता येणार नाही. त्यामुळे फेसबुक सोडता येत नसेल, तर नोकरी सोडा, असे न्यायालयाने चौधरी यांना सुनावले.
भारतीय लष्कराने 6 जूूूनला जवानांसह अधिकाऱ्यांना फेसबूक, इन्स्टाग्रामसह 89 इतर चिनी ॲप्स बंद करण्यास सांगितले होते. तसेच हे ॲप फोनमधून डिलीट करण्याचाही आदेश देण्यात आला होता. त्यावर लेफ्टनंट कर्नल चौधरी यांनी लष्कराच्या आदेशाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
चौधरी यांनी याचिकेत म्हटले होते की, अकाउंट बंद केले तर फेसबुक अकाउंटमधील डेटा, संपर्क, मित्रांशी असलेला संपर्क तुटेल. त्यावर न्यायालयाने तुम्ही फेसबुक बंद करा. कधीही तुम्हाला नवीन अकाउंट उघडता येईल. तुम्ही लष्कराचा भाग आहेत, तुम्हाला आदेश पाळावे लागतील. फेसबुक सोडता येत नसेल तर नोकरी सोडा, असेही उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने लेफ्टनंट कर्नल पी. के. चौधरी यांना सुनावले.