सलग चार दिवस बँक बंदमुळे ग्राहकांना त्रास
कोल्हापूर प्रतिनिधी
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने पुकारलेल्या दोन दिवशीय संपामुळे कोल्हापूर जिल्हयातील सुमारे एक हजार कोटी रूपयाची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. खासगीकरण तसेच कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील सर्व कामगार संघटनांनी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा शाखा व कर्मचाऱयांचा समावेश आहे. शहरातील कर्मचाऱयांनी आपआपल्या शाखेसमोर तर संघटना प्रतिनिधींनी टाऊन हॉलच्या हिरवळीवर निदर्शने केली.
शनिवारी व रविवारी बँकांना सुट्टी असते. या सुट्टीला लागूनच सोमवारी व मंगळवारी राष्ट्रीयकृत बँकांनी संप पुकारला आहे. मार्च एंडिंग असल्याने व संपामुळे बँक ग्राहकांची त्रेधातिरपट उडाली आहे. संपामुळे कोटयवधी रूपयाची आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून, एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. कोल्हापूर जिल्हयात दोन दिवशीय संपामुळे सुमारे एक हजार कोटी रूपयाची उलाढाल ठप्प झाली आहे.
संपामध्ये जिल्हायातील 12 पैकी 9 राष्ट्रीयकृत बॅकासह रत्नाकर बँक व फेडरल बँक या खासगी बँकांचा समावेश आहे. तर मार्च इंडिंगमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कामकाज अंशतः सुरू होते. जिल्हयातील विविध बँकामधील 350 शाखेतील सुमारे 4500 कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.
संपाच्या काळात ऑनलाईन व्यवहार सुरू राहणार असून,शनिवार,रविववारच्या सुट्टीला लागून,संप पुकारल्याने,चार दिवशीय ब्ंादमुळे एटीएमवर परिणाम होऊन खडखडाट जाणवत आहे. या संपाचे नेतृत्व संजय उलपे, सुहास शिंदे,जिवन करवीरकर,प्रफुल्ल जाधव,विकास देसाई,पूजा जाधव यांनी केले आहे. .