राज्यातील पहिल्या सभेत राहुल गांधी कडाडले
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीकरता पश्चिम बंगालमध्ये पहिली प्रचारसभा बुधवारी घेतली आहे. उत्तर दिनाजपूरच्या गोलपोखरमध्ये आयोजित सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले आहे. दोघेही बंगालमध्ये फूट पाडू पाहत आहेत. बंगालींमधील बंधूभाव संपविण्याचा दोघांचा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
आग लागली तर ती बंगालमध्ये लागणार आहे. यातून बंगाल होरपळेल, बंगालच्या माता आणि भगिनी रडतील. कारण एकदा बंगालला विभागल्यावर येथे आग लागेल आणि ती कुणीच रोखू शकत नाही. भाजपने उत्तरप्रदेशात आग लावून त्याच बळावर ते निवडणुकीत जिंकले. त्यानंतर तेथे काय घडले, आज उत्तरप्रदेशात कोरोनाकाळात रुग्णालये मृतदेहांनी भरलेली आहेत, लोक कोरोनामुळे मरत आहेत. मुख्यमंत्र्यांना कसलीच जाणीव नसल्याचे राहुल म्हणाले.
भाजपसोबत कधीच नाही
बंगालमध्ये जी विचारसरणी भाजप फैलावू पाहत आहे तीच विचारसरणी आसाममध्ये फैलावली जात आहे. अण्णाद्रमुकच्या माध्यमातून द्वेष आणि हिंसाचाराची विचारसरणी तामिळनाडूतही फैलावण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाने कधीच भाजपसोबत तडजोड केलेली नाही. आमची लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीशी आहे. आमची लढाई केवळ राजकीय नाही. त्यांच्या विचारसरणीने आमचे सर्वात मोठे नेते आमचे गुरु महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. आम्ही त्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहू, आम्ही मागे हटणार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचे विधान केले होते, तृणमूलमुक्त भारताचे नव्हे, कारण तृणमूल काँग्रेस त्यांच्यासारखाच आहे. राहुल गांधी मागे हटणारा नाही, राहुल गांधी घाबरत नसल्याचे ते जाणतात असे विधान काँग्रेस नेत्याने केले आहे.
रोजगार देण्यासाठी प्रथम डिपॉझिट द्यावे लागणारे हे पहिलेच राज्य आहे. ममता बॅनर्जी निवडणुकीच्या काळात खेळ होणार असल्याचे म्हणत आहेत. पण येथील रस्ते कोण तयार करणार असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे.