प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात यावर्षी वसुलीचे असलेले उद्दीष्ठ कसल्याही परिस्थितीत पूर्ण करायचेच असा निर्धार करत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी वसुली विभागास ऍप्शन प्लॅन दिला आहे. त्या प्लॅननुसार सोमवारपासून काम सुरु होणार आहे. बडे थकबाकीदार आहेत. त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यापासून कर वाचवण्यासाठी मालमत्ता सदरी नोंदच केली नाही अशा करबुडव्यांचा शोध घेवून त्यांच्यावर शास्ती लावण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिल्या आहेत. दरम्यान, कारवाई करताना कोणतीही मुलाहिजा करु नका. कोणाचा राजकिय दबाव आला तरीही तमा बाळगू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. मला वसुली हवी आहे, अशा शब्दात सक्त सुचना मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिल्या आहेत. दरम्यान, त्यामुळे सोमवारपासून वसुली पथकाच्या दोन गाडय़ा शहरात कर गोळा करण्यासाठी फिरणार आहेत.
घरपट्टी, पाणी पट्टी हे कर मार्च एण्डपूर्वीच पालिकेने वसुल करणे आणि नागरिकांनी ते वेळेत भरणे दोघांचे कर्तव्य आहे. मात्र, शहरातील काही बडी मंडळी आहेत त्यांच्या बडय़ा बडय़ा इमारती, टुमदार बंगले, अलिशान प्लॅट असतात. परंतु कर भरण्याच्या नावाने शिमगा असतो. अगदी पालिकेचे कर मागणी पत्र पालिकेचा कर्मचारी घेवून आला की वाडय़ावरुन फोन आहे म्हणून लगेच कर्मचाऱयावर दमदाटी करुन पिटाळून लावणारे काही सातारकर असतात. सर्वसामान्य मात्र नियमित न चुकता कर भरतात. अशा बडय़ांचीच थकबाकीचा आकडा मोठा आहे. तर काही कोर्ट केसेसमुळे वसुली राहिलेली आहे. काहींनी जुन्या वास्तूच्या जागी नव्याने इमारत उभी केली. तसेच मोकळय़ा जागेत वास्तू उभी केली. परंतु त्या नवीन वास्तूची नोंद नवीन आराखडय़ानुसार केल्यास कर ज्यादाचा भरावा लागेल यासाठी नोंदच पालिकेच्या मालमत्ता सदरी करण्यात आलेली नाही, अशी अनेक प्रकरणे आहेत. तर काही मंडळींनी तर पाण्याचे नळ कनेक्शन आहे परंतु त्याचे बिलच भरले नाही. त्यामुळे थकबाकीचा आकडा हा वाढतच गेलेला आहे. मार्च महिन्यांच्या एण्डींगपर्यंत वसुलीचे टार्गेट पूर्ण करता येईल या दृष्टीने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी वसुली विभागाच्या सर्वच कर्मचाऱयांची शनिवारी आढावा बैठक घेतली. बडय़ा थकबाकीदारांना सोडू नका, ज्यांच्या मिळकती आहेत. परंतु नोंद नाहीत. त्यांची मोजमापे करुन त्यांच्याकडून कर वसुली करा. तसेच ज्यांच्या यापूर्वी मिळकती सील केलेल्या आहेत. त्या पालिकेच्या नावे करण्यासाठी त्या त्या प्रभागातील अधिकाऱयांनी तसे प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाऱयांकडे पाठवा, बडय़ा थकबाकीदारांकडून जर वसुलीदरम्यान कोणाकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर त्यास आजिबात घाबुरु नका. कर वसुलीचे उद्दीष्ठ पूर्ण करा, मी तुमच्या पाठीशी आहे, अशा त्यांनी सुचना दिल्या.