कोरोनानंतर आता बर्ड फ्लूच्या साथीनेही डोके वर काढल्याने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. पक्षी अथवा कोंबडय़ांना होणाऱया या आजाराचा झपाटाही कोरानासारखाच असल्याने त्याच्या संक्रमणापासूनही जपावे लागेल. या सगळय़ाचा परिणाम चिकन व अंडीविक्री आणि पर्यायाने त्यावर आधारलेल्या रोजगार नि अर्थकारणावरही होण्याची भीती संभवते. त्यामुळेच बर्ड फ्लूकडेही तितक्याच गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरते. मागच्या मार्चपासून अवघा देश कोरोनाच्या महाकाय संकटाशी झुंजतो आहे. कोरोनावरील लसीकरणाला प्रारंभ झाल्याने देशातील नागरिक सुटकेचा निःश्वास टाकत असताना पक्ष्यांवरील रोगाचा प्रादुर्भाव वाढावा, हे खचितच वातावरण दूषित होत असल्याचेच गमक मानायला हवे. राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, कर्नाटकपासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेक राज्यांमध्ये पक्ष्यांवरील या आजाराने हात पाय पसरलेले दिसतात. हरियाणात महिनाभरात तब्बल 4 लाख कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. राजस्थानमध्ये पोल्ट्रींची संख्या मोठी आहे. तेथून मध्य प्रदेश व अन्य राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात चिकन व अंडय़ांचा पुरवठा होतो. परंतु, कोंबडय़ा व पक्ष्यांवरील साथीच्या संक्रमणामुळे येथील स्थिती पूर्णपणे बिघडलेली पहायला मिळते. महाराष्ट्रात परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, बीड, रायगड, पुणे अशा काही जिल्हय़ांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे दिसून येते. बाधित भागातील सुमारे 25 हजार कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. याशिवाय राज्यात 32 बगळे, चिमण्या, पोपट व 59 कावळय़ांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जाते. या सगळय़ा चिंता वाढविणाऱया बाबी म्हणाव्या लागतील. 2006 ते 2018 दरम्यान भारतात 200 वर हॉटस्पॉट आढळून आले होते. त्यात तब्बल 83.49 लाख पक्ष्यांचा मृत्यू होऊन पोल्ट्री व्यावसायिकांचे 26.37 कोटी इतके नुकसान झाल्याचे आकडेवारी सांगते. 2006 मध्ये महाराष्ट्रातील नंदूरबारमध्ये बर्ड फ्लूने अक्षरशः हाहाकार उडविला होता. त्यावेळी प्रारंभी तब्बल एक लाख 90 हजार कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्या, तर नंतर जळगाव परिसरात 50 ते 60 हजार कोंबडय़ा नष्ट केल्या गेल्या. मात्र, अलीकडच्या काळात महाराष्ट्रात या आजाराचा तितकासा प्रभाव दिसून आलेला नाही, हे विशेष. पण म्हणून आताही स्थिती सामान्य राहील, या भ्रमात राहता कामा नये. पक्ष्यांच्या विष्ठेशी संपर्क टाळणे, पक्षी, कोंबडय़ांचे पिंजरे, कुऱहाडे तसेच त्यांना खाणे घालण्याची भांडी दररोज डिटर्जंट पावडरने धुणे, कच्चे चिकन हाताळताना मास्क वा हातमोज्याचा वापर करणे, ही पथ्ये प्राधान्याने पाळावी लागतील. कोंबडय़ा अथवा कावळा, चिमणी वर्गातील पक्षी मृत आढळल्यास याबाबत गुप्तता न ठेवता याची माहिती जिल्हा व विभागीय नियंत्रण कक्षास कळविणे आवश्यक असेल. जेणेकरून या आजाराचा प्रसार रोखता येऊ शकेल. तसेच अशा मृत पक्ष्यांचा स्पर्श टाळण्याबरोबरच कच्चे वा अर्धे कच्चे मांस वा अंडी खाण्यापासून सावध रहावे लागेल. पूर्णपणे शिजवलेले मांस खाल्ल्यास त्यापासून धोका नाही. अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास हा विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे अशी उकडलेली अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे. वैज्ञानिकदृष्टय़ा तो योग्यच. वास्तविक जगभरात मागील 20 ते 25 वर्षात बर्ड फ्लूची केवळ 825 लोकांना बाधा झाली आहे. भारतात आतापर्यंत बर्ड फ्लूची मानवात लक्षणे दिसून आल्याचे एकही उदाहरण नाही. मांस 100 डिग्री सेल्सिअसच्या आसपास शिजविण्याच्या भारतीय पद्धतीमुळे येथील लोक आजवर बर्ड फ्लूमुक्त राहिले असावेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु, इतिहास निरोगी आहे म्हणून गाफिल राहणेही अनुचित. पोल्ट्री चालक व नागरिक अशा दोन्ही घटकांनी आवश्यक ती स्वच्छता व काळजी घ्यावी. ती व्यवस्थितरीत्या घेतली, तर ही साखळी तोडणेही अवघड नाही. पोल्ट्री व्यवसायातून देशभरात करोडो रुपयांची उलाढाल होते. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते. लहरी निसर्ग, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱयाला कोरोना काळात यातही मोठे नुकसान सोसावे लागले. या उद्योगाला फक्त दोन महिन्यातच 100 कोटी डॉलरची झळ बसल्याचे सांगण्यात येते. त्या धक्क्यातून सावरून हा उद्योग भरारी घेण्याच्या स्थितीत असतानाच त्याला बर्ड फ्लूचा विळखा पडल्याने अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात महिन्याला चार कोटी ब्रॉयलर कोंबडय़ांचे उत्पादन होते, तर दिवसाला 13 लाख कोंबडय़ांची विक्री केली जाते. मध्यंतरी रोडावलेली मागणी कुठे 90 टक्क्यांपर्यंत आलेली असताना कोंबडय़ांचा भाव किलोला 90 रुपयांवरून 55 रुपयांपर्यंत घसरणे म्हणजे या व्यवसायाच्या मानगुटीवर सुरी फिरल्यासारखेच म्हणावे लागेल. खरेतर या उद्योगावर शेतकऱयांसह अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. अनेकांना रोजगार देणाऱया व अर्थकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया या उद्योगावर संक्रांत येणे परवडणारे नाही. म्हणूनच आलेल्या या संकटाशी दोन हात करावेच लागतील. निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यात पशू, पक्ष्यांसह सर्वच प्राणीमात्र महत्त्वाची भूमिका बजावतात. किंबहुना, प्रदूषण वा हरित वायू उत्सर्जनासारख्या मानवनिर्मित समस्येने वातावरणात बदल होत आहेत. त्यातून प्राण्यांमधील प्रतिकारशक्तीही कमी होत असून, अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. कोरोनाने एकीकडे माणसाला धडा दिला असतानाच बर्ड फ्लूनेही विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. म्हणूनच ही संकटे परतवतानाच वातावरणातील शुद्धतेकरताही पावले उचलावी लागतील.
Previous Articleबेटी बचाओ, बेटी पढाओ…
Next Article मराठा आरक्षणातील लोकसेवा आयोगाची लुडबूड थांबवा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.