गेल्या काही शतकांमध्ये स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन संकुचित होत गेला. इतका की, मुलगी जन्माला येणे हा जणू घराण्याला कलंक आहे. डोक्मयावर एक मोठे ओझे आहे. मुलगा हा वंशाचा दिवा इ. भ्रामक, तद्दन खोटय़ा कल्पना समाजमनात घर करून राहिल्या. त्यामुळे मुलीचा जन्मच नाकारण्यापर्यंत लोकांची मजल गेली. त्यातूनच स्त्रीभ्रूणहत्यासारखे प्रकार सर्रास घडू लागले, आजही घडतात. त्याचा घातक परिणाम समाजावर दिसू लागला. मुलींचे लोकसंख्येचे प्रमाण घटू लागले. 1000 मुलांमागे 947 मुली असे विषम झाले. साहजिकच पुढे मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला.
आज समाजात उलटी स्थिती दिसते. आता त्यांच्या अटी, अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा मिळण्यासाठी मुलींना निवडीची संधी आहे. याचे कारण गेल्या काही वर्षांमध्ये मुलींच्या घटत्या संख्येला आळा घालण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. अगदी सरकारनेही यांची गंभीर दखल घेतल्याने 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी, तिला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे मुलींच्या जन्माला येण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. मृत्यूदर घटण्यास मदत झाली. खरेतर फार प्राचीन काळापासून कित्येक वर्षे स्त्रियांना समाजात पुरुषांइतकाच मान होता. अगदी ऋग्वेद काळातही अनेक सूक्ते स्त्रियांनी लिहिलेली आढळतात. त्याही उत्तम विद्वान होऊन स्वतःची गुरुकुले चालवित होत्या. राजसभेत, विद्वत्सभेत वादविवाद करीत होत्या. अशी उज्ज्वल परंपरा असताना, मधल्या एका मोठय़ा कालखंडात देशावरील अनेक परकीय आक्रमणांमुळे स्त्रीकडे पाहण्याचा द=िष्टकोन बदलला. ती एक भोग्यवस्तु मानली जाऊ लागली. म्हणूनच आज ‘बेटी बचाओ’ सारखी आंदोलने करण्याची वेळ आली.
‘स्त्रिया निसर्गतःच पंडित असतात’ असे कालीदास आपल्या जगप्रसिद्ध ‘शाकुंतल’ नाटकात म्हणतो. स्त्रीणां अशिक्षितपटुत्वं अमानवीषु। संदृश्यते किमुत य प्रतिबोधवत्यः।। याचा अर्थ, मनुष्येतर प्राण्यांमधील स्त्रियात न शिकताच चातुर्य दिसून येते. मग ज्यांना शिक्षण मिळाले आहे, अशा स्त्रियांविषयी काय बोलावे? म्हणजेच ‘जगावे कसे?’ यांचे उपजत शहाणपण तिच्याकडे असतेच. पण जर ती शिकून शहाणी झाली तर ती आपले जीवन अधिकच चांगले जगेल. तसेच स्त्रीमुळेच घराला अर्थ किंवा घरपण प्राप्त होते. म्हणून एक स्त्री शिकली, तर सारे घरच सुशिक्षित होईल नाही का? आज ते घडताना आपण पाहतो. स्त्रियांना आता केवळ आकाश हीच मर्यादा आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे.