बसवण कुडचीतील शेतकऱयांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बळ्ळारी नाल्यामुळे बसवण कुडची परिसरातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. बसवण कुडची-कणबर्गीला जाण्यासाठी बळ्ळारी नाल्यावर पूल होता. मात्र, तो पूल वाहून गेला आहे. त्याची पुन्हा उभारणी करावी, बळ्ळारी नाल्याच्या पाण्यामुळे शिवारात इंजेक्शनच्या सुया व इतर साहित्य वाहून येत आहे. त्या सुया पायाला लागून दुखापती होत आहेत. तेव्हा बळ्ळारी नाल्यामध्ये दवाखान्यांतील साहित्य फेकू नये यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी बसवण कुडची परिसरातील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील शेतकऱयांची जमीन बळ्ळारी नाल्याच्या दुसऱया बाजूला आहे. त्या शेतीला जाण्यासाठी पूर्वी पूल होता. मात्र तो वाहून गेला आहे. तेव्हा मोठे पाईप घालून त्या ठिकाणी पुलाची बांधणी करा, अशी मागणी केली आहे. बळ्ळारी नाल्याचे पाणी शिवारात जाऊन 500 ते 600 एकरमधील भातपीक कुजून गेले आहे. तेव्हा शेतकऱयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी माजी नगरसेवक बसवंत हलगेकर, के. एन. बेडका, बी. टी. यमाजी, के. आर. अनगोळकर, वाय. बी. बेडका, मोनाप्पा चौगुले आदी उपस्थित होते.