नवी दिल्ली
कोरोना लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात भारतीय कंपन्या आपल्या रिक्त पदांची भरती करताना अंतर्गत निवड पद्धतीवर भर देत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. अंतर्गत निवड पद्धतीत, बाहेरून नवे कर्मचारी घेण्यापेक्षा कंपनीत असणाऱया कर्मचाऱयांची विशिष्ट पदांवर काम करण्यासाठी निवड केली जाते. ही पद्धती प्रामुख्याने कर्मचाऱयांना पदोन्नती (प्रमोशन) देताना किंवा कर्मचाऱयांची कंपनीच्याच इतर शाखांमध्ये बदली करताना उपयोगात आणली जाते.
कोरोना लॉकडाऊननंतरच्या काळात भारतातील 100 पैकी 90 हून अधिक कंपन्यांनी (93 टक्के) ही पद्धती अवलंबिलेली दिसून येते, असे लिंक्डइन या मिडियमने तयार केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. अंतर्गत पद्धतीने रिक्त पदे भरताना कंपन्या प्रामुख्याने संपर्ककौशल्य (कम्युनिकेशन स्किल), समय व्यवस्थापन (टाईम मॅनेजमेंट) आणि समस्यानिवारण कौशल्य (प्रॉब्लेम सॉल्व्हींग स्किल) यांचा विचार करतात. ही सर्व निरीक्षणे नोंदविलेला हा अहवाल, लिंक्डइनने जीएफके या मार्केट रिसर्च कंपनीच्या सांगण्यावरून तयार केला असून तो या कंपनीला सादर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात 3 हजार 500 भारतीय कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.