बेळगुंदी बसथांब्यावरील प्रकार : संबंधितांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहराची स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वाटचाल सुरू आहे. शहरात नवीन स्मार्ट बसथांबे उभारून विकास साधण्यात येत आहे. मात्र युनियन जिमखान्याजवळील पश्चिम भागात जाणाऱया प्रवाशांसाठी बसथांब्याअभावी उन्हाचा सामना करावा लागत आहे. कित्येक दिवसांपासून मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पश्चिम भागातील बेळगुंदी, बाकनूर, बिजगर्णी, बडस, राकोसकोप, यळेबैल, सोनोली, बेनकनहळ्ळी, कावळेवाडी, तुडये आदी भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र या भागात जाणाऱया प्रवाशांना थांबण्यासाठी बसथांबा नसल्याने उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे.
हजारो प्रवासी दररोज शहराकडे येत असतात. याठिकाणी प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत थांबत असतात. त्यामुळे सकाळी सायंकाळच्या वेळेत प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे प्रवासी बसच्या प्रतीक्षेत भररस्त्यात थांबत असतात. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडण्याची शक्यता आहे. दरम्यान अवजड वाहने आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यातच दुपारच्यावेळी उन्हाच्या झळा वाढत असल्याने याठिकाणी थांबणे असहय़ होत आहे. विशेषतः लहान मुले, महिला व वयोवृद्धांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ट नागरिक व लहान मुलांना बसथांब्याअभावी रस्त्यातच ताटकळत थांबावे लागत आहे. बसथांब्याअभावी काही प्रवासी उन्हाच्या झळापासून बचावासाठी झाडांचा आसरा घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याठिकाणी तातडीने बसथांबा उभारावा, अशी मागणी होत आहे.