प्रतिनिधी / बेळगाव
दररोज हजारे प्रवाशांनी गजबजणाऱया बसस्थानकात कचऱयाची समस्या गंभीर बनत आहे. एकीकडे परिवहन प्रवाशांची संख्या वाढवून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मात्र बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बसस्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
बसस्थानक आवारात जागोजागी कचरा पडून दुर्गंधी पसरली आहे. वेळेत कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बसस्थानकातील कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. बसस्थानकाच्या आवारात नवीन स्मार्ट बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करून बससेवा पुरविली जात आहे. मात्र, या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शौचालयात अस्वच्छता असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आवारात पुरुष-महिलांसाठी तात्पुरत्या शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी कोणतीच सुविधा न पुरविल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत सुमारे तीस कोटी रुपये खर्च करून सुसज्ज आधुनिक बसस्थानक उभारण्यात येत आहे. मात्र, बसस्थानकात सोयीपेक्षा असुविधाच अधिक दिसून येत आहेत. बसस्थानकाच्या आवारात ठिकठिकाणी पसरलेल्या कचऱयाची उचल करावी, अशी मागणी होत आहे.