वार्ताहर/ धामणे
बस्तवाड (ह.) येथील शेतकरी भैरू केदारी चौगुले यांच्या शेतातील भात पिकाची गंजी अज्ञातांनी पेटविल्याने भाताची गंजी जळून खाक होऊन सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या शेतकऱयाची शेती शगणमट्टी शिवारात सर्व्हे नं. 49/6 मध्ये असून गेल्या चार दिवसापूर्वी भातपिक कापून याच शेतात गंजी घातली होती. परंतु शुक्रवार दि. 20 रोजी रात्री या गंजीच्या शेजारी बसून दारू पिऊन तेथेच बाटल्या फोडून भाताची गंजी पेटविली असल्याचा संशय असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार शनिवारी सकाळी समजल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण भैरु चौगुले हा शेतकरी 75 वर्षीय असून बस्तवाड गावात दररोज वृत्तपत्राचे गावभर फिरुन वाटप करतो. बस्तवाड ग्राम पंचायतचे ते 30 वर्षे कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम केले आहे. अशा गरीब शेतकऱयांच्या हातातोंडाला आलेल्या भातपिकाची गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने येथील नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत असून येथील शतेकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे..