प्रियकराने केले होते वडिलांसमवेत वाढदिवसाचे नियोजन : वडिलांनी वाढदिवसास मान्यता दिल्याने सिद्धी तणावाखाली
गिरीश मांद्रेकर /म्हापसा
राज्यात गाजत असलेल्या सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली असून तणावाखाली येऊन सिद्धीने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलीस आता त्या दृष्टीनेही तपास करु लागल्याने याप्रकरणातील सत्त्य लवकरच उघड होईल, असे दिसत आहे.
सिद्धीने 11 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली तरी 10 ऑगस्ट रोजी रात्री सिद्धीचा प्रियकर सोमेश (रा. नावेली सांखळी) याने सिद्धीचे वडील संदीप यांना फोन करून सिद्धीच्या बहिणीचा 13 ऑगस्ट रोजी वाढदिवस कुठे साजरा करुया, याबाबत चर्चा करून तसे नियोजनही केले होते. त्यास वडील संदीप यांनी मान्यता दिल्यावर सिद्धीला राग आला. त्यांचे घरात कडाक्याचे भांडण होऊन हाणामारीही झाली होती. त्यात सिद्धी तणावाखाली गेली. आपला प्रियकर आपल्या बहिणीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार व आपल्या पालकांनी त्यास मान्यताही दिल्याने सिद्धी वैफल्यग्रस्त झाली. त्यातूनच सकाळी बाहेर पडताना आपल्या वडिलांना तुम्हाला आपला मृतदेह सापडेल, असा इशाराही दिला होता. अखेर सिद्धीचा मृत्यू हा वडिलांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच झाला आहे, अशी माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे.
सिद्धीचा प्रियकर सोमेश याला पोलीस चौकशीसाठी बोलावून त्याची जबानी घेतली असता पोलिसी इंगा दाखवल्यावर त्याने सत्य बाहेर आणले. याबाबत यापूर्वी सिद्धीची मावस बहीण अस्मिता हिने सर्व माहिती व कुटुंबीयांचे कारनामे आपल्या पोलीस जबानीत पोलिसांना दिले होते.
तणावामुळेच सिद्धीला देवभक्ताकडेही नेले होते
सिद्धी वर्षापूर्वी सोमेशच्या प्रेमात होती. हे प्रेम प्रकरण घरापर्यंत पोचल्यावर वडिलांनी सिद्धीला दमही दिला होता मात्र ती ऐकत नसल्याने वडिलांनी तिला मारहाणही केली होती. शिवाय रागाच्या भरात सिद्धीचा फोनही फोडून टाकला होता. त्यानंतर सिद्धी काहीकाळ सोमेशपासून दुरावली होती. कालांतराने सिद्धीला कोरोनाची लागण झाल्याने ती आपल्या घरातच खोलीत एकटी राहत होती. त्यावेळी ती घाबरलेल्या अवस्थेत व तणावाखाली होती. त्यातून बाहेर पडल्यावर सिद्धीला देवभक्ताकडेही नेण्यास आले होते, अशी माहिती हाती आली आहे.
बहिणीमध्ये होत होते वाद
सिद्धीला कोरोनाची लागण झाली त्यावेळी सिद्धीचा प्रियकर सिद्धीच्या बिहिणीला फोन करीत असे. त्यातच त्याचे सूत तिच्या बहिणीशी जमले. त्यानंतर तो तिच्याशी तासनतास बोलत होता. ही माहिती सिद्धीला कळल्यावर सिद्धी तणावाखाली गेली होती. दोघांमध्ये वादही निर्माण झाले होते.
सिद्धीच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम बहिणीला
सिद्धी नाईक समुद्रकिनाऱयावर कशी पोचली हा प्रश्न पोलिसांसमोर होता. सिद्धीचा मृतदेह पहाटे 6.30 वाजण्याच्या दरम्यान आढळून आला, त्याची सर्वप्रथम माहिती सिद्धीच्या बहिणीला लागली, असे चौकशीत आढळून आले आहे. तशा आशयाची मेसेजही तिच्या बहिणीने प्रियकराला पाठविला असल्याचे समजले आहे. त्यामुळे येथेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लाटांबरोबर सिद्धीचे कपडे गायब झाले असावेत
दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिद्धीने आत्महत्या केल्यावर पावसात मोठय़ा लाटांबरोबर पाण्यात गेली असावी. पाण्याच्या जोरदार लाटांमुळे तिचे कपडे पाण्यात गेले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. पाच वर्षापूर्वी सिकेरी येथे बुडालेल्या मुलीच्या अंगावरील सर्व कपडे लाटांबरोबर गायब होते. अशाच अन्य दोन घटना हरमल व काणकोण समुद्रकिनाऱयावरही आढळून आल्या होत्या असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र सिद्धी समुद्रकिनाऱयावर कशी पोचली, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
व्हिसेरा ठेवला नसल्याचे झाले स्पष्ट
आपल्या मुलीचे आपल्याशी भांडण झाले होते त्यातच तिने तणावातून आत्महत्या केली असावी अशी जबानी तिचे वडील संदीप यांनी शवचिकित्सा करणारे डॉक्टर आंद्रे व अंकुश यांच्यासमोर दिली होती. वडिलांची जबानी नोंद करून शवचिकित्सा करणाऱया डॉक्टरांनी वडिलांची जबानी पत्रावर सही घेऊन मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला होता. त्यामुळे ही आत्महत्या असल्याने डॉक्टरांनी व्हिसेरा अहवाल ठेवला नाही असे डॉक्टरांनी आपल्या जबानीत पोलिसांना सांगितले आहे. उपअधीक्षक एडवीन कुलासो यांनी प्रयोग शाळेच्या अधीक्षकांना पत्र पाठवून सिद्धीचा व्हिसेरा अहवाल देण्याची मागणी केली असता डॉक्टरांनी अखेर व्हिसेरा ठेवला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सिद्धी नाईक आत्महत्येस पोलीस जबाबदार- आग्नेल फर्नांडिस
सिद्धीच्या मृत्यूबाबत आपण उपजिल्हाधिकाऱयांना तसेच उपअधीक्षक एडवीन कुलासो यांना जाब विचारला होता. दोघांनीही व्हिसेरा आहे असे सांगितले होते. पण आता सांगतात व्हिसेरा नाही, यातच स्पष्ट होते की पोलीस हे प्रकरण लपवू पाहत आहेत. हे खून प्रकरणच आहे, त्यात पोलीस निरीक्षक आहे त्यांना निलंबित करावे. राजकारणी यात गुंतलेले आहेत, हे स्पष्ट होते. सिद्धी नाईक प्रकरणातच व्हिसेला का ठेवण्यात आला नाही, असा प्रश्न माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी उपस्थित केला आहे.
हा पूर्वनियोजित खून : जेसेफ सिक्वेरा
14 दिवस झाले तरी सिद्धीला न्याय मिळत नाही. पोलीस निरीक्षक नालास्को याबाबत काहीच कारवाई करीत नाही. सर्वांची तोंडे बंद केली आहेत. कपडे नाही, अंगावर काहीही नाही मग हे प्रकरण खून म्हणून का नोंद केले जात नाही. पोलिसांनी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास भाग पाडले. हा पूर्वनियोजित खून आहे. मंत्री मायकल लोबो छोटय़ा छोटय़ा गोष्टीवर आवाज करतात मग यावर आवाज का उठवित नाही? पोलीस स्थानक झोपलेले आहे, असे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले.