“चीनच्या सगळय़ा वस्तूंवर बहिष्कार घालायचं का रे?’’ कॉफी घेत नाग्याने विचारले. आमच्या भागातला लॉकडाऊन सैल झाला होता. पण उडप्याने हॉटेल न उघडता कागदी कपात कॉफी द्यायला सुरुवात केली होती. कॉफी पीत आम्ही रस्त्यावरच एकमेकांपासून सहा फुटांवरून बोलत होतो.
“का बरं? काय झालं?’’
“त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं ना?’’
“पण सरकारने जाहीर केलंय की घुसखोरी झालीच नाही. आपली सगळी सीमा सुरक्षित आहे.’’ “असं म्हणतंय? अरे देवा. तरी पण मला चीनबद्दल खूप राग असतंय. आता मी चीनचं एकही वस्तू घेणार नाही.’’
“तुला एक गोष्ट ठाऊक आहे का? आपल्याकडे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीत देखील चिनी कंपन्यांचा पूर्ण किंवा थोडा तरी वाटा असतोच. उदाहरणार्थ सरदार पटेलांचा भव्य पुतळा असो, विविध गंभीर रोगांवरची औषधे असोत, मेट्रो गाडय़ांचे डबे आणि इतर भाग, वाहनांचे भाग, वेगवेगळय़ा ठिकाणी लागणारी यंत्रसामग्री, मोबाईल फोन्स, संगणक…चीनची अर्थव्यवस्था इतकी महाकाय आहे की आपण त्यांच्याकडून दिवाळीतले रंगीत दिवे वगैरे गोष्टींवर बहिष्कार टाकून त्यांना काहीच फरक पडणार नाही.’’ “मग आपण नुसतं गप्प बसायचं काय?’’ “आपण सुरुवात करायची. पण लगेच फळाची अपेक्षा धरायची नाही. साधा मोबाईल बघ. चिनी मोबाईल इतरांपेक्षा अतिशय स्वस्त असतो. भारतीय किंवा इतर कंपन्यांचा मोबाईल सामान्य माणसाला कदाचित परवडणारच नाही. शिवाय मेड इन इंडिया मोबाईलमधले देखील काही भाग चीनकडूनच आलेले असतात. माझ्या मते यावर एक उपाय आहे.’’ “काय?’’ “दर वषी जूनमध्ये विविध शहरात वेगवेगळय़ा राजकीय पक्षांचे छोटे छोटे नेते घाऊक खरेदी करून विद्यार्थ्यांना वह्यापुस्तके आणि इतर शालेय साहित्य स्वस्तात पुरवतात, काही वेळा मोफत देखील देतात. तसेच उपक्रम राबवायला काय हरकत आहे? भारतीय कंपन्या, वितरक आणि राजकीय नेते यांनी थोडी थोडी झळ सोसली तर स्वदेशी वस्तू स्वस्त होऊ शकतील. लोकांना हळूहळू स्वदेशीचा ओढा निर्माण होईल. स्वातंत्र्यपूर्व काळात देशप्रेमी लोक स्वस्त आणि तलम विदेशी कापडावर बहिष्कार टाकून जाडीभरडी खादी खरेदी करीतच होते की नाही? तसं आपण देखील ओबडधोबड भारतीय मोबाईल घेऊ. त्यातून लगेच काही होणार नाही. पण काही दशकांनी याची फळे नक्की चाखायला मिळतील.’’ कॉफी संपली आणि आम्ही घरी परतलो.