प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये गेले दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे पडून शहरीसह बहुतांश ग्रामीण भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही गावांमध्ये तर दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा बंदच असल्यामुळे ग्रामीण भाग अंधारातच होता. मंगळवारी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू राहिल्याने प्रशासकीय कामकाजही ठप्प झाले होते.
दोडामार्गसह जिल्हय़ाच्या काही भागात चक्रीवादळाचाही मोठा तडाखा बसला. या वादळी वाऱयामुळे सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्ग या तालुक्यांसह जिल्हय़ातील इतर भागातही झाडे पडून मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली. बऱयाच ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली होती. ओरोस, कणकवली भागातील ट्रान्सफॉर्मर बंद पडले होते. कुडाळ, सावंतवाडीमध्ये दिवसभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सिंधुदुर्गनगरीमध्ये दुपारपासून सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. जिल्हय़ात आणखी दोन दिवस वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून काही दिवस लागण्याची शक्यता वीज महावितरण कंपनीकडून वर्तविण्यात आली.