24 तासात कोरोनाचे 92 हजार 71 नवे रुग्ण; 1 हजार 136 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाच्या 92 हजार 071 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या 1 हजार 136 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 48 लाख 46 हजार 428 वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी 9 लाख 86 लाख 598 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 37 लाख 80 हजार 108 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशभरातील 79 हजार 722 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या 22,084 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 391 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूदर सध्या 2.81 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत 51 लाख 64 हजार 840 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील 10 लाख 37 हजार 765 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी कोरोनाच्या लढाईत कोणतीही ढिलाई बाळगून चालणार नाही, असे देशवासियांना सांगितले. जगाच्या कोणत्याही कोपऱयात कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी, याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. आपले वैज्ञानिक सर्वांना या संकटातून बाहेर काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.