रस्ता उंच झाल्यास पावसाळय़ात शिवाराला येणार महापूर : पाण्याचा निचरा होणे अवघड
प्रतिनिधी /येळ्ळूर
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम दडपशाही करत सुरू करण्यात आले आहे. त्या रस्त्याची उंची वाढविण्यासाठी माती टाकण्यात येणार आहे. जवळपास 8 ते 10 फूट रस्त्याची उंची होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे येळ्ळूर, शहापूर शिवारातील पाण्याचा निचरा होणे कठीण जाणार आहे. यापूर्वी या शिवारातील पाणी बळ्ळारी नाल्याला जात होते. मात्र आता रस्ता झाल्यानंतर पाण्याला जाण्यासाठी वाटच राहणार नाही. त्यामुळे येळ्ळूर शिवाराला सर्वात जास्त फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता सुपीक जमिनीतून करण्यात येत आहे. शेतकऱयांनी या रस्त्याला तीव्र विरोध केला आहे. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण हा रस्ता करत आहे. या रस्त्यामुळे वडगाव, शहापूर, मजगाव, अनगोळ, मच्छे, पिरनवाडी, येळ्ळूर, जुने बेळगाव परिसरातील शेतकरी भूमीहीन होणार आहेत. यापूर्वीच बळ्ळारी नाल्याला पूर येऊन शेकडो एकर जमिनीतील भातपीक कुजून जात होते. त्यातच हा रस्ता झाल्याने गंभीर समस्या उद्भवणार आहे. हलगा-मच्छे बायपास हा रस्ता जवळपास साडेनऊ किलो मीटर आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तिबारपिकी सुपीक जमीन आहे. या जमिनीमधील पाण्याचा निचरा होणे अवघड आहे. चारपदरी व उंच रस्ता होत असल्याने पाण्याचा निचरा होणे अवघड आहे. एकूणच आता येळ्ळूरसह परिसराला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. एक तर महागाई आणि पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यातच हे रस्ते अनधिकृतपणे केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहे. विकासाच्या नावाखाली बळीराजा मात्र देशोधडीला लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.