तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी साडेचार तास आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन दीड तास, अशी जवळपास सहा तास प्रदीर्घ चर्चा केली. अर्थातच ही चर्चा राजकीय स्वरूपाची होती आणि राज्यपाल, ईडी, सीबीआय अशा विविध माध्यमातून राज्यांना हैराण केले जात असल्या विरोधात संयुक्त शक्ती निर्माण करणे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या राजकारणाला एक पर्यायी सक्षम राजकीय पर्याय निर्माण करणे या दृष्टीनेच ही चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर केंद्राकडून सुडाचे राजकारण कशा पद्धतीने सुरू आहे याबाबतचे स्पष्ट वक्तव्य करून आपण केसीआर यांच्याशी याच बाबतीत बोलण्यास उत्सुक होतो हे दर्शवले आहे. महाराष्ट्राला लागून आपली 1000 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि महाराष्ट्राच्या मदतीने राज्याचा उत्कर्ष साध्य करणे आम्हाला शक्य झाले आहे, यापुढेही चांगली देवाण-घेवाण करून एकमेकाला मदतीला येण्याचा गोड शेजारधर्म राव यांनी बोलून दाखवला. दोन्ही नेते वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना छायाचित्रकारांनी दोघांनाही विजयाची खूण करण्याचे आवाहन केले होते. मात्र तसे चिन्हांकित न करता एकीची वज्रमूठ दाखवू असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुठ उंचावली. आपल्या वक्तव्यातून काहीही संदेश गेला तरी कृतीतून जाणारा संदेश हा काँग्रेसला दुखावणारा असू नये याची दक्षता ठाकरे यांनी घेतली. दुसरीकडे शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे असे राव यांनी जाहीर केले. त्याचवेळी पवारांनी आपल्या घरी झालेली चर्चा ही राजकीय कारणांपेक्षा सामाजिक कारणांनी अधिक झाली आहे आणि देशापुढे बेरोजगारी, गरिबी, शेतकऱयांचे प्रश्न आणि इतर आव्हाने असताना जनतेला एक सक्षम पर्याय कसा देता येईल या दृष्टीने आपण चर्चा केल्याचे हेतुतः जाहीर केले. केसीआर यांचे तेलंगणातील शेतकऱयांचे प्रश्न सोडवण्याचे मॉडेल देशाला उपयुक्त असून विकासाच्या मुद्यावर आपली अधिक चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. केसीआर यांची तेलंगणा निर्मितीच्या काळातील लोकसभेत झालेली भाषणे ज्यांना माहीत आहेत त्यांना त्यांच्या दाक्षिणात्य नेते असून उत्तम हिंदी बोलण्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही. आंध्रप्रदेशमधून बाजूला होऊन स्वतंत्र राज्य निर्माण होईपर्यंत त्यांनी ज्या त्वेषाने लढा दिला आणि उपोषणाचा दबाव वाढवून काँग्रेसला निर्णय घ्यायला लावला त्यावरून त्यांची जिद्द आणि चिकाटी दिसून आली होती. पुढे भावांतरसारखी योजना राबवून शेतकऱयांना अतिरिक्त पैसा कसा दिला जाऊ शकतो याचे उत्तम मॉडेल त्यांनी दाखवले आहे. याचा पवारांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तर अत्यंत सूचकपणे बोलताना राव यांनी पवारांना तेलंगणा निर्मितीच्या काळात दिलेल्या साथीबद्दल, त्यांच्या ज्ये÷त्वाबद्दल मान देत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सहमती घडवू शकलो याची धन्यता व्यक्त केली. लवकरच याबाबतची पुढची बैठक पवारांच्या बारामतीत किंवा हैदराबादला, जसे ठरेल त्याप्रमाणे होईल हेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींचा इतका सविस्तरपणे विचार करण्यामागे प्रमुख कारण आहे ते, यशवंत सिन्हा, सुधींद्र कुलकर्णी यांचा पहिला व ममतांचा काँग्रेस वगळून विरोधी एकीचा फसलेला दुसरा प्रयोग. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार चालवणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष तिसरा सहभागीदार पक्ष काँग्रेसला दूर ठेवून देशात बिगर भाजप आघाडीला साथ देतील का? या प्रश्नात. यापूर्वी ममता बॅनर्जींनी मुंबई दौरा केला होता. मात्र त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांची भेट घेता आली नाही. राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडून विरोधी आघाडीचा विचार होऊ शकत नाही अशी भूमिका स्पष्टपणे घेतली होती. मात्र यावेळी राव यांना दोन्ही नेते भेटले आणि काँग्रेसबाबत कोणतीही चर्चा त्यांनी किमान माध्यमांसमोर तरी केली नाही. त्यामुळे ही आघाडी बिगर काँग्रेस बिगर भाजप अशी होईल का? केवळ देशातील प्रादेशिक पक्षांची ही एकजूट ठरेल का आणि त्याला सर्व प्रादेशिक पक्ष साथ देतील का? हे प्रश्न आहेतच. शिवाय हे सगळे पक्ष एकत्रित लढणार का? तशी त्यांची आघाडी होऊ शकेल का? असे प्रश्न निर्माण होतात. उत्तर प्रदेशात आपले वातावरण निर्माण करताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी 2017 साली केलेली चूक सुधारत काँग्रेसला दूर ठेवून छोटय़ा छोटय़ा विभागीय शक्तिमान पक्षांची एकजूट बांधली. त्यामुळे त्यांचे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजप जर उत्तर प्रदेशात पूर्वीइतक्मया 200 हून अधिक जागा मिळवू शकला नाही ही किंवा उत्तर प्रदेशात सत्ता गमवावी लागली तर विरोधकांच्या आघाडीला एक प्रकारे बळकटी मिळणार आहे. त्यात इतर प्रादेशिक शक्तीही सामील होईल. लवकरच होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हे सर्व पक्ष एकत्र आव्हान देतील. पण जर उत्तरप्रदेशातील प्रयोग फसला तर मात्र ही एकजूट कितपत होईल हे सांगता येणे मुश्कील. तरीही भाजपच्या आक्रमक आणि दबावाच्या राजकारणाला पर्याय म्हणून वेगवेगळय़ा राज्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र आवाज उठवण्याचे प्रयत्न मात्र, उत्तर प्रदेशचे निकाल कसेही लागले तरी सुरूच राहतील. त्यात महाराष्ट्र पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, झारखंड मुख्यमंत्री आघाडीवर असतील. लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने सुनावलेली पाच वर्षांची शिक्षासुद्धा विरोधकांच्या एकीस कारण ठरेल. स्वतःकडे 20 टक्के राष्ट्रीय मते बाळगणारा काँग्रेस या विरोधी आघाडीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र देशात जागा वाटप करताना त्याचे मोठेपण या प्रादेशिक शक्तीना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ही आघाडी कशी घडणार की निवडणुकीनंतर एकत्र येऊ या विचाराने 2019 सारखाच प्रादेशिक पक्षांसह काँग्रेसचाही घात होणार? याची या पक्षांना नक्कीच चिंता आहे. त्यासाठी ते काँग्रेसला दूर ठेवू इच्छित नाहीत मात्र काँग्रेसचे आदेश मानण्याचीही त्यांची तयारी नाही.
Previous Articleआजचे भविष्य मंगळवार दि. 22 फेब्रुवारी 2022
Next Article वाहन उत्पादनाला येणार वेग
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.