वार्ताहर/ कराड
कोरोना संकटाच्या सुरूवातीच्या एक ते दोन महिन्यात कराड शहरातही एकही रूग्ण सापडला नव्हता तर तालुक्यात मोजके बाधित आढळले होते. त्यावेळी लोकांत कोरोनाविषयी प्रचंड भीतीचे वातावरण होते. लोक काळजी घेत होते. याउलट शहरासह तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना लोक मात्र बिनधास्त असल्याचे पाहावयास मिळत आहेत. रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असून रूग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. तालुक्यातील परिस्थिती आवाक्याच्या बाहेर चालली आहे. त्यामुळे आतातरी लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून स्वत:ची व समाजाची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कराड तालुका सुरूवातीपासूनच कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला आहे. सुरूवातीच्या दोन महिन्यात तालुक्यात मोजके कोरोना बाधित आढळत होते. कराड शहराने मात्र कोरोनाला वेशीवरच आडवले होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा वेगही कमी होता. मात्र त्यावेळी लोकांतही कोरोनाविषयी प्रचंड भीती होती. त्यामुळे लोक काळजी घेताना दिसत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मात्र लोक आणि कोरोना दोघेही मोकळे झाले. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बाजारपेठ व उद्योगधंदे सुरू झाल्याने लोकांची वर्दळ वाढली तसा कोरोनाचा संसर्गही वाढल्याचे पहावयास मिळत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर व सेशल डिस्टन्स राखणे अतीमहत्वाचे आहे. सध्या लोकांकडून पोलीस कारवाईच्या भीतीने मास्क वापरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरात सोशल डिस्टन्सचा मात्र फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून रूग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. उपचाराअभावी अनेक लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे लोकांनी आतातरी कोरोनाचे गांभीर्य ओळखून स्वत:ची व समाजाची सुरक्षितता जपणे गरजेचे आहे.
एकाच वेळी बंद करणे गरजेचे
कोरोना बाधितांच्या साखळया तोडण्यासाठी कराड शहरातील व्यापाऱयांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवसांचा लॉकडाऊन केला. मात्र त्याचवेळी मलकापूरसह परिसरातील सर्व गावांतील बाजारपेठा व व्यवहार सुरळीत सुरू होते. तर कराड शहरातील वर्दळ कायम होती. यानंतर गेल्या सात दिवसांपासून ओगलेवाडीत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मलकापूरमध्येही दोन दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. एकापाठोपाठ गावांनी लॉकडाऊन केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा उद्देश सफल होताना दिसत नाही. एक गाव बंद असले तरी दुसरे गावातील व्यवहार सुरू असल्याग्नने एका गावातील लोक दुसऱया गावात ये जा करीत आहेत. त्यामुळे कोरोनाला खरेच रोखायचे असेल तर मुळात लोकांनी मनावर घ्यायला पाहिजे. लोकांनीच मनापासून काळजी घेतली तर कोरोनाला रोखणे शक्य आहे. लॉकडाऊनच करायचा असेल तर मुख्य शहरासह परिसरातील सर्व गावातही त्याच वेळी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे.
मास्कचा वापर 95 टक्क्यांवर
शहरात मास्कचा वापर 95 टक्के होत आहे. अपवाद वगळला तर कोणीही विनामास्क फिरताना दिसत नाही. मध्यंतरी पोलिसांनी विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा धडाका लावला होता. त्याचा चांगला परिणाम झाला असून विनामास्क लोक घरातून बाहेर पडत नाहीत.