तीन दिवस पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट : गुजरातला गुरुवारी धडक : पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘बिपरजॉय’चे अतिशय तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होत असल्यामुळे त्याचा धोका वाढला आहे. सध्या केरळ ते गुजरात या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून समुद्रही खवळलेला दिसून येत आहे. लाटांचा वेग आणि उंची वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ गुऊवारी गुजरातच्या कच्छ भागात धडकू शकते. 15 जूनच्या दरम्यान ‘बिपरजॉय’ गुजरात भागात तीव्र होणार असल्यामुळे आतापासूनच सावधगिरी बाळगली जात आहे. किनारपट्टी भागातील अनेक रेल्वेगाड्या सोमवारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या चक्रीवादळाचा वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली.
‘बिपरजॉय’च्या वाढत्या तीव्रतेमुळे समुद्राच्या मध्यातून उंच लाटा उसळत असून त्या किनाऱ्यावर आदळत आहेत. मोठमोठ्या लाटांमुळे गुजरातच्या दक्षिण आणि उत्तर किनारपट्टीवर मासेमारीवर बंदी घालण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हटवले आहे. आतापर्यंत सुमारे 1,300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्मयता असून ते 15 जून रोजी दुपारपर्यंत सौराष्ट्र, कच्छ आणि मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान पाकिस्तान किनारपट्टी ओलांडणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये दिली आहे. या काळात वाऱ्याचा वेग 125-130 किमी प्रतितास ते 150 किमी प्रतितास इतका वाढू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पीएमओ, गृह मंत्रालयाकडून आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, पॅबिनेट सचिव राजीव गौबा, सचिव एम रविचंद्रन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य कमल किशोर आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते. या बैठकीत दिलेल्या सुचनांनुसार कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी या भागात विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नुकसान झाल्यास तात्काळ मदतीसाठी तत्परतेसह अत्यावश्यक सेवांची देखभाल सुनिश्चित करण्यास पंतप्रधानांनी बजावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1 तास वादळाचा आढावा बैठक घेतली.