प्रतिनिधी/ खानापूर
आपल्या शेतातील मिरची पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱयावर एका बिबटय़ाने हल्ला केला. पण त्या हल्ल्यातील संबंधित शेतकरी सुदैवाने बचावल्याची घटना अवरोळी (ता. खानापूर) येथे बुधवारी सकाळी घडली. सदर शेतकऱयाचे नाव श्रीशैलगौडा पाटील असे आहे.
अवरोळी परिसरात मिरचीची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. या भागातील शेतकरी वर्गही सध्या मिरची पिकाला पाणी लावणे. मिरची तोड करणे आदी कामात गर्क आहेत. बुधवारी सकाळी श्रीशैल पाटील हे शेतकरी देखील मिरची पिकाला पाणी देण्यात व्यस्थ होते. त्याचवेळी अचानकपणे त्याठिकाणी एक बिबटा आला. त्याने श्रीशैलवर हल्ला केला. पण श्रीशैलने प्रसंगावधान राखून आपल्या हातातील लाठीने त्या बिबटय़ावर प्रतिहल्ला केल्याने तो बिबटय़ा घाबरून पळून गेला. यामध्ये श्रीशैल हा किरकोळ जखमी झाला आहे. याच बिबटय़ाने मंगळवारी रात्री अवरोळी या गावातील शेतकऱयाची बकरीही फस्त केली आहेत. अवरोळी ग्रामस्थाने या दोन्ही घटनेची माहिती गोल्याळी वनविभागाला कळविली. याची माहिती मिळताच नागरगाळी विभागाचे एसीएफ एस. एच. मिरजी, गोल्याळी विभागाचे रेंजर श्रीनाथ कडोलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱयांनी घटनास्थळी येऊन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. अवरोळी परिसरात गेल्या काही दिवसापासून सदर बिबटय़ाचा वावर सुरू आहे. यामुळे अवरोळी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्या बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे. त्या बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे. त्या बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी वनखात्याने अवरोळी परिसरात गस्त सुरू ठेवली आहे.