वार्ताहर / कास
दुर्गम कांदाटी खोऱ्याला नेटवर्कने जोडून ठेवणारा उतेश्वरच्या डोंगरावरील बीएसएनएलचा टॉवर गेले तीन दिवस बंद असल्याने संपूर्ण कांदाटी खोरे संपर्कहीन झाले असून बीएसएनएलच्या या कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. गेले 3 दिवस कांदाटी खोऱ्यातील 16 गावे संपर्कहिन झाली आहेत. या भागासाठी उत्त्वेश्वर या ठिकाणी एकमेव टॉवर आहे. हा सोळा गावे व ईतर उपवस्त्यांसाठी एकमेव सेवा असून देखील कंपनीकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. टॉवर बंद होण्याची समस्या बारमाही सुरु आहे.
रीचार्ज मात्र पुऱ्या महिन्याचा पण सेवा ही दहा ते पंधरा दिवसाची अशी कायम गत आहे. सामान्य माणसांचे खिसे फक्त खाली होत आहेत. मात्र सेवा काही मिळत नाही. या ठिकाणी होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. परिणामी टॉवरच्या बॅटरी संपून सगळा भाग संपर्कहीन होतो. जसे बीएसएनएलला या समस्येबाबत देणेघेणे नसते. तसेच वीज मंमळाचे ही आहे. या टॉवरचा वीजपुरवठा सातत्याने बंद पडतो पण याकडे कंपनी लक्ष देत नाही. तरी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी लोकांमधून होत आहे.
“महाबळेश्वर तालुक्यात अती दुर्गम भाग कांदाटी खोरे अशी या भागाची ओळख आहे. पण शासनाने तर पूर्ण पाट फिरवली असल्याटी खंत एकच आहे. देश स्वतंत्र झाला पण आम्ही कांदाटीकर जसे आहोत तसेच आहोत. बीएसएनएल कंपनी ने तात्काळ दखल घेऊन टॉवरला जनरेटर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून लाईट नसली तरी टॉवर चालू राहील. आज माणूस आजारी झाला तर प्रकृती कशी आहे. याची काही माहिती सुद्धा मिळत नाही. टॉवर लवकर चालू व्हावा अशी आमची मागणी आहे. ” – शशिकांत भातोसे, शेतकरी गाव आकल्पे, कांदाटी