व्हीआरएसच्या कर्मचाऱयांना पुन्हा रुजू करण्याची योजना
वृत्तसंस्था/ मुंबई
सरकारी दूरसंचार कंपन्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्याकडून पुन्हा कर्मचारी भरती करण्याची योजना आखली जात आहे. तोटय़ामध्ये प्रवास करत असल्यामुळे या दोन्ही कंपन्यांनी मध्यंतरी 55 ते 60 वयाच्या कर्मचाऱयांसाठी स्वेच्छा निवृत्ती (व्हिआरएस) योजना लागू केली होती. या योजनेत अधिकच्या कर्मचाऱयांचा समावेश केल्याने आता दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचाऱयांची कमतरता जाणवत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरापासून मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱयांकडून व्हिआरएस घेण्यास सुरुवात केली गेली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योजना अस्तित्वात आल्यावर अनेकांनी व्हिआरएस घेण्यास सुरूवात केली होती. गेल्या वर्षभराच्या काळातच दोन्ही कंपन्यांतील 93 हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारी यांनी व्हिआरएससाठी अर्ज केले होते, असे समजते. बीएसएनएल आणि एमटीएनएल यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागाने (डीओटी) विविध विभाग व विविध कार्यालयांशी संपर्क साधण्याचे काम पार पाडलेले आहे. जे कर्मचारी व्हिआरएस घेतलेले आहेत त्यांना सल्लागार म्हणून भरती करून घेण्यावर विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
2019 मध्ये योजना लागू
केंद्र सरकारने ऑक्टोबर 2019 रोजी बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी व्हिआरएस योजनेला मंजुरी दिली होती. यामध्ये बीएसएनएलने आपल्या वेतन खर्चात 50 टक्के कपात करण्याच्या योजनेला मान्यता दिली तर एमटीएनएलने यामध्ये 75 टक्क्यांपर्यंत मंजुरी दिली होती.