प्रतिनिधी /बेळगाव
‘ज्ञानाची माहितीची भूक कधीही कमी होणार नाही, ती असणारच आहे. त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. ज्ञान माहिती मिळविण्याचे माध्यम बदलले असेल तर तो बदल कालानुरुप होत आहे. नव्या माध्यमाशी आपण मैत्री केली पाहिजे’, असे मत लेखिका माधुरी शानभाग यांनी व्यक्त केले. लोकमान्य ग्रंथालयाचा आगळा वेगळा उपक्रम बुक लव्हर्स क्लबच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्रंथालयाच्या चर्चासत्रात त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. व्यासपीठावर त्यांच्यासमवेत ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे व बुक लव्हर्स क्लबचे सचिव किशोर काकडे होते.
जगदीश कुंटे यांनी स्वागत करून चर्चासत्राचे प्रयोजन विशद केले. किशोर काकडे यांनी बुक लव्हर्स क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. निमंत्रित ग्रंथपालांनी आपले अनुभव सांगितले.
शहापूरच्या सरस्वती वाचनालयाच्या मुख्य ग्रंथपाल सविता पारनट्टी म्हणाल्या, ‘आजकाल टीव्ही आणि सोशल मीडियामुळे पुस्तक वाचनाचा कल कमी झाला आहे.’ चिदंबरनगर येथे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आपण वाचनालय चालविते, असे प्रभा मुळगुंद यांनी सांगितले. वाचनाचा आनंद हा अमूल्य असून त्याची किंमत करता येत नाही. असे सांगून सुरुवातीला जो प्रतिसाद होता तो आता कमी झाल्याचे प्रतिपादन विनिता वाघ यांनी केले.
आपण मोफत वाचनालय चालवितो. खास करून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. असे विद्या वाचनालयाच्या तनुजा दड्डीकर म्हणाल्या. जीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे ग्रंथपाल गुरुनाथ पर्वतीकर म्हणाले, ‘लायब्ररी म्हणजे एक विद्यापीठच असते.’ लोकमान्य ग्रंथालयाच्या रंजना कारेकर यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी केलेल्या विविध उपक्रमांचा लेखाजोखाच सादर केला. ज्या वाचकांना लायब्ररीपर्यंत येता येत नाही. अशांना घरपोच सेवा देऊन ‘ग्रंथालय आपल्या दारी’ ही योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे लायब्ररीयन प्रवीण हुल्लोळी म्हणाले, ‘ग्रंथालयात एक अद्भूत शक्ती असते. तिचा अनुभव मी घेतला आहे. त्यामुळे प्रोफेसर होण्याची संधी नाकारून मी ग्रंथपालच झालो.’ वाङ्मय चर्चा मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल पाटणेकर म्हणाले की, ‘वाचनाबद्दलचा रुढीबद्ध विचार सोडून द्यावा लागेल. या ना त्या रुपात वाचन चालूच असते. ते कमी होणार नाही. का आणि कसे वाचायचे याचे प्रशिक्षण लहान वयात देणे जरुरीचे आहे.’ वाचकांतर्फे मोहन इजारे, अनिरुद्ध ठुसे यांनी चर्चासत्रात भाग घेतला. आरती आपटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक देऊन सर्व ग्रंथपालांचे स्वागत करण्यात आले.