प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथील शेतकऱयांच्या जमिनी पुन्हा बुडा हिसकावण्याच्या तयारीत आहे. शेतकऱयांना याबाबत आमिष दाखविण्यात आले. मात्र शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला असून आम्ही बुडाला कदापीही एक इंचही जमीन देणार नाही, असा इशारा अनगोळ येथील शेतकऱयांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांना दिला आहे.
अनगोळ येथील शेत जमिनीमध्ये यापूर्वी बुडाने दोन स्कीम राबविल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. आता पुन्हा बुडा येथील जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही सर्व जमीन तिबारपिकी असून एक इंचही जमीन आम्ही देणार नाही. काही शेतकऱयांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आम्हाला तुमचे पैसे नको, आम्हाला जमीन हवी आहे, असे या निवेदनाद्वारे म्हटले आहे.
अनगोळ येथील शेतकरी या जमिनीमधून तीन पिके घेतात. त्यामुळे ही जमीन गेली तर जगायचे कसे? असा प्रश्न शेतकऱयांनी केला आहे. सर्व जमीन सुपीक असल्याने आम्ही ही जमीन कदापीही देणार नाही. या जमिनीवरच आमचे कुटुंब अवलंबून आहे. तेव्हा या जमिनीचा हट्ट बुडाने सोडावा, असेही निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अर्जुन बुद्रुक, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, जयराज हलगेकर, कृष्णा बुद्रुक, सोमाण्णा सोमनाचे, अशोक होळकर, प्रदीप गडकरी, मारुती बुद्रुक, नागेश जाधव, मनोहर सोमनाचे, नारायण धाकलुचे, अशोक मुतगेकर, आनंद यल्लमण्णावर यांच्यासह शेतकरी व महिला उपस्थित होत्या.