नियम तोडणाऱयांवर लक्ष ठेवणार मार्शल पथक
प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे कोविड नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. नियम तोडणाऱयांवर मार्शल पथके लक्ष ठेवणार आहेत. नियमानुसार ते कारवाई करणार आहेत. कठोर नियमांची अंमलबजावणी होणार असून या नियमांची मार्गसुची जिल्हानगर अभिवृध्दी योजना निर्देशक ईश्वर उळागड्डी यांनी जारी केली आहे.
जिह्यातील 33 नगरपंचायत आणि नगरपालिका यासह ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये हे मार्शल काम करणार आहेत. एकूण 121 मार्शल पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे जनतेने आता तरी शहाणे होण्याची गरज निर्माण झाली आहे.
1) भाजीमार्केट, बाजारपेठ या ठिकाणी मार्शल लक्ष देणार. तीन फुटांचे अंतर ठेवूनच व्यवसाय करावा लागणार आहे. तीन फुटाचा अंतर नसेल तर त्यांच्याकडून दंड आकारला जाणार आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले नाही तर संबंधिताला तातडीने आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे.
3) दुकानदार व इतर उद्योजकांनी तीन फुटांचे अंतर ठेवूनच व्यवसाय करावा लागणार आहे. मास्क न घातलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे साहित्य देवू नये. साहित्य देताना बॉक्साचा वापर करावा लागणार आहे.
4)महापालिका हद्दीमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱयांना 250 रुपये दंड तर नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्राम पंचायत हद्दीमध्ये 100 रुपये दंड वसुल केले जाणार आहे. हे काम कोविड मार्शलच करतील, असेही म्हटले आहे.
5)लग्नासाठी केवळ 50 लोकांनाच परवानगी राहणार असून त्यापेक्षा अधिक व्यक्ती राहिल्यास होणार कारवाई
6) लग्नासाठी संबंधित प्राधिकाराकडूनच घ्यावी लागणार परवानगी. लग्नाच्या ठिकाणी मार्शल होणार तैनात
7) लग्नाची परवानगी नसताना लग्न करण्यासाठी कार्यालय दिल्यास संबंधित कार्यालयाचा परवाना होणार रद्द
8) जन्मदिवस किंवा इतर कार्यक्रमाला हॉलमध्ये 25 जणांना परवानगी. खुली जागा असेल तर 50 जणांचा असणार समावेश
9) अंत्ययात्रा आणि अंत्यविधीही करण्यासाठी 50 जणांनाच मुभा असून जर स्मशानभूमी लहान असेल तर तेथे 25 जणांनाच परवानगी असणार आहे.
10) धार्मिक इतर कार्यक्रमांना केवळ 25 जणांना परवानगी
11) कोरोना बाधित झाल्यानंतर घरात शौचालय असल्यास होमकेअरची परवानगी
12) शौचालय नसल्यास कोविड सेंटरला व्हावे लागणार रुग्णाला दाखल
अशा प्रकारे मार्गसुची जारी करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असेही या आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱयांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमांतून सर्व नगरपंचायत, नगरपालिका आणि ग्राम पंचायतींना याबाबत आदेश दिले आहेत.