आ. रेजिनाल्डने घेतला पुढाकार : बस बेंगलोरकडे रवाना
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील अनेक विद्यार्थी सद्या शेजारील राज्यांमध्ये शिक्षण घेत असून ते लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले आहे. आपली मुले पुन्हा घरी पोचत नसल्याने अनेकांचे पालक चिंताग्रस्त बनले आहे. याच पार्श्वभूमीवर बेंगलोर व बेळगांव मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पुढाकार घेऊन एक बस बेंगलोरकडे पाठविली आहे. आज हे विद्यार्थी गोव्यात पोचतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बेंगलोर येथील विविध महाविद्यालयात शिकणारे सुमारे सोळा विद्यार्थी आहेत तर बेळगांव येथील केएलई मध्ये चार विद्यार्थी आहेत. या सर्वांना एकाच बसमधून गोव्यात आणले जाणार असल्याची माहिती आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी बुधवारी गोव्यातून बस बेंगलोरकडे रवाना झाली व काल गुरूवारी सकाळी ते बेंगलोरमध्ये पोचली.
बेंगलोरमधील विद्यार्थ्यांना घेऊन ही बस बेळगांवला येईल. त्या ठिकाणी केएलईमधील चार विद्यार्थ्यांना घेऊन गोव्याकडे निघणार आहे. आज शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळ पर्यंत ही बस गोव्यात पोचणार आहे. गोव्याबाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणावे अशी सातत्याने मागणी सरकारकडे केली जात होती. परंतु, या विषयांकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. मात्र, लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात रेजिनाल्डने स्वता पुढाकार घेऊन बसची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना परत आणले जात आहे. या विद्यार्थ्यांना मोफत परत आणले जात असून त्याच्याकडून कोणतेच शुल्क आकारले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडून परवानगी हवी होती. ती मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना परत आणण्यासाठी आपल्याकडे संपर्क साधला होता. त्या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची सर्व माहिती जिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात आली व त्यानंतर अधिकृत परवानगी घेण्यात आली. या कामी आपल्याला अन्य तिघांची मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या 20 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या कुडतरी मतदारसंघातील नाही. हे विद्यार्थी गोव्याच्या विविध भागातील आहे. आपल्याला या विषयावर राजकारण करायचे नाही तर गोव्याबाहेर अडकलेल्या गोवेकरांना परत आणण्यासाठी सरकारने तातडीने उपाय योजना आखावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करणार
हे विद्यार्थी गोव्यात पोचल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यांचा कोविड अहवाल येई पर्यंत त्यांना नियमांप्रमाणे क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती आमदार रेजिनाल्ड यांनी दिली.