प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात परराज्यातून येणाऱयांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे साहजिकच क्वारंटाईनची संख्या वाढत चालली असून त्यामुळे प्रशासनाने स्वॅब तपासणीही वाढविली आहे. रविवारी सायंकाळी जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला 810 अहवालांची प्रतीक्षा आहे.
स्वॅब तपासणीची संख्या वाढती आहे. जिल्हय़ात 2043 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. खासकरून मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा शहरातून बेळगाव जिल्हय़ात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कारण गेल्या आठवडाभरात मुंबईहून आलेल्यांमध्ये बाधितांची संख्या वाढती आहे.
जिल्हय़ातील 9 हजार 846 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून आतापर्यंत 4 हजार 285 जणांनी चौदा दिवसांचे तर 3 हजार 469 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. आतापर्यंत 8 हजार 550 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यामध्ये 7 हजार 471 निगेटिव्ह तर 121 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
121 पैकी 79 जण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील डीसीएम हॉस्टेलमध्ये परराज्यातून आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. शनिवारी गोकाक येथील क्वारंटाईन केंद्रातून एक 30 वषीय महिला बेपत्ता झाली होती. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती.
या महिलेचा पती पॅरोलवर कारागृहातून सुटला आहे. त्याला भेटण्यासाठी ती गेली होती, अशी माहिती मिळाली आहे. हे दांपत्य बेल्लद बागेवाडी येथे सापडले असून त्या दोघा जणांना पुन्हा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. अशा घटनांमुळे क्वारंटाईन केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱयांना करण्यात आली आहे.