प्रतिनिधी/ खेड
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमानी येणार असल्याने त्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र असे असताना बोगस ई-पासच्या आधारे जिल्हय़ात प्रवेश करणाऱया 30 प्रवाशांनी भरलेली बस येथील पोलिसांना कशेडी चेकपोस्टवर ताब्यात घेतल्याची बाब पुढे आली आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना ई-पास असणे आवश्यक असून 14 दिवसांचा होम क्वारंटाईन, गर्दी न करणे आदी अटी-शर्थीचे घालण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करून कोरोना कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चाकरमान्यांना ई-पासच्या आधारे जिह्यात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी प्रवाशांची कसून चौकशी महामार्गावरील कशेडी चेकपोस्टवर पोलिसांकडून सुरू आहे. या चौकशीत बोगस ई-पासचा प्रकार उघडकीस आला असून अशा बोगस ई-पासचा वापर करणाऱया प्रवाशांच्या बसला येथील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बाब पुढे आली आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, बोगस ई-पास 4 हजार देऊन प्रवाशांची फसवणूक होत असून याचा शोध पोलीस घेणार आहेत. ई-पासशिवाय जिह्यात प्रवेश मिळणार नसून जिल्हा प्रवेश बंदी उठवण्यात आलेली नाही. त्यामुळे कशेडी घाटातून कोकणात प्रवेश करणाऱया चाकरमान्यांकडील ई-पासची चौकशी करून मगच पुढील प्रवासाला हिरवा कंदील दिला जाणार आहे. कोणीही बोगस ई-पासचा वापर करून पोलीस प्रशासनाची फसवणूक करू नका आणि तसे केल्याचे उघडकीस आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाच्यावतीने माहिती व जनसंपर्क अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी दिला आहे.