प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत जाहीर केल्यानंतर गेल्यावेळच्या लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल केले आहेत. मात्र या बाबत जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी जिह्यासाठी नियमाची माहिती न दिल्याने व्यापारीवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.
गेल्यावेळीही जिल्हा प्रशासनाने माहिती दिली नव्हती. जिल्हाधिकारी यांनी या बाबत नागरिकांना माहिती देणे आवश्यक असताना कोणतीच माहिती जारी न केल्याने अद्यापही नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. ‘मिशन बिगीन अगेन’खाली राज्य शासनाने या लॉकडाऊनमध्ये काही सवलती दिल्या होत्या. परंतु काही नियमांबाबत स्थानिक पातळीवर प्रशासनाला अधिकार दिले होते. यामुळे प्रशासनाने दुकानांच्या वेळेबाबत व या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या अन्य सवलतींबाबत जनतेच्या माहितीसाठी लेखी आदेश देणे गरजेचे होते. परंतु हे जाहीर न झाल्याने दुकानांत वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु मागील लॉकडाऊनमध्ये ठरलेल्या प्रमाणेच सकाळी 9 ते रात्री 7 ही दुकानाची वेळ राहणार आहे. रत्नागिरीत त्यामुळे काही व्यापारी वेळ उलटली तरी दुकाने उघडी ठेवत होते. याउलट सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांनी शिथिल झालेल्या नियम व दुकानांच्या वेळेबाबत तसेच या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या अन्य सवलतींबाबत स्वतः जातीने स्पष्टीकरण दिल्याने त्या ठिकाणी मात्र संभ्रम होण्यास वाव मिळालेला नाही.