प्रतिनिधी / सांगली
राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शासन स्तरावरून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधीत कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील. असे आज मंत्रालयीन दालनात पार पडलेल्या बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या रब्बी हंगामात “प्रदिप सेल्स, मेन्टा रोड जालना” या कंपनीमार्फत माहे सप्टेंबर, २०२० कालावधीत जिल्ह्यात जवळ पास ८ टन कांदा बियाणे हजारो शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. मात्र सदर कांदा बियाण्यांची उगवण न झाल्याने सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
या बाबतची माहिती निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी डॉ. कदम यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांचेसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी बोलतांना डॉ. कदम म्हणाले की, शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये जर विविध प्रकारच्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जर शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल तर कृषी विभागाच्या वतीने यावर कठोर निर्णय घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे निर्देश यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्री बाबत सविस्तर माहिती आयुक्त कृषी यांनी घेऊन कृषी विभागाच्यावतीने या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी सूचना केली.
बैठकीला कृषी सचिव .एकनाथ डवले तसेच सह सचिव, कृषि .वी.बी पाटील, संचालक कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण .दिलीप झेंडे, अवर सचिव, . उमेश आहिर तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी .विराज शिंदे, संभाजी भोईटे राजेंद्र कदम, विद्याधर धुमाळ आदी सह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.