अध्याय चौदावा
भागवताबद्दल नाथमहाराज सांगतात की, कोटय़वधी ग्रंथ अवलोकन केले तरी त्या ग्रंथांत भागवताचे ज्ञान दृष्टीला पडत नाही. त्यातील ‘हंसगीत’ नांवाचे जे ज्ञान, ते जनार्दनाच्या कृपेने येथे मराठी भाषेमध्ये यथार्थ रीतीने सांगितले. शेवटी भगवंत म्हणाले, एकनि÷sने माझी भक्ती केली असता ज्ञानरूप खड्गाची प्राप्ती होते आणि त्याच शस्त्राने संसाराची आसक्ती छेदून माझ्या भक्तांना सायुज्यमुक्ती प्राप्त होते. ते ऐकून उद्धवाच्या मनात असा विचार आला की, भजनानेच मुक्ती मिळते असे देव सांगतात, पण याबद्दल ज्ञात्यांची मते पाहिली तर ते मोक्षप्राप्तीसाठी भिन्न भिन्न साधने सांगतात. तेव्हा मोक्षप्राप्तीचे श्रे÷ साधन कोणते ? आपली शंका देवांना विचारावी म्हणून उद्धव म्हणाला श्रीकृष्णा ! ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान, इत्यादी अनेक साधने सांगितली आहेत. हे सर्वच मुख्य आहेत की, यापैकी कोणते तरी एक मुख्य आहे ? मोक्षमार्गाला साधने किती आहेत ? वेदवाद्यांच्या मताप्रमाणे पाहिले तर ते अनेक साधने सांगतात. ती सर्व साधने सारख्याच योग्यतेची आहेत काय ? की एक गौण व एक श्रे÷ असा प्रकार आहे ? तुम्ही तर स्वतः मुक्तीला कारण भक्तीच होय असे सांगितले. या भक्तीने सर्व तऱहेची आसक्ती नाहीशी होऊन मन आपल्या ठायीच लागून राहाते. भक्त इतर साधनांची आशाच करीत नाहीत. सर्व संगांचा त्याग करतात. कारण, जिच्या योगाने तत्काळ आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, अशी भक्तीच मोक्षमार्गामध्ये मुख्य आहे. फलाची आशा सोडून माझे भजन करणे, हेच मोक्षाचे मुख्य साधन आहे, असे तुम्ही स्वतः सांगितलेत. तेव्हा इतर मंडळी जी साधने सांगतात, त्यांनी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते किंवा नाही, हे तुम्ही मला उलगडून सांगा. उद्धवाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, यातील जाणकार म्हणजे ज्ञानी मंडळींचा स्वभाव त्रिगुणात्मक असल्यामुळे ते आपआपल्या आवडीप्रमाणे साधने स्वीकारीत असतात. ज्या गुणामध्ये ज्याची आवड असते, तो तेच साधन खरे मानतो. त्यांना ज्ञानाचा अभिमान वाटत असल्याने ते अनेक साधनांबद्दल बडबडत असतात. उद्धवा ! हीच परंपरा पुष्कळ दिवस चालत असल्यामुळे ज्ञात्याचे ज्ञान मलिन झाले आहे. त्याला क्षुद्र फळे येतात तरी तेच ज्ञान खरे असे मानतात. आजपासून आपण अभ्यासत असलेल्या चौदाव्या अध्यायामध्ये भगवंत ध्यानयोगस्थिती व समाधी ह्यांनी युक्त अशी जी भक्ती, तीच सर्व साधनात मुख्य आहे आणि इतर साधने फलाची इच्छा धरणारी असल्यामुळे तुच्छ आहेत इत्यादि बाबी विशद करून सांगत आहेत. ते म्हणाले, माझी वेदवाणी स्पष्ट आहे. ती ज्ञानरूपी प्रकाशाने अत्यंत उज्वल झालेली आहे. पण प्रलयकालामध्ये सत्यलोक जेव्हा जळून खाक झाला, तेव्हा ती नाश पावली. त्या प्रलयात ब्रह्मदेवाचा नाश झाला असताना खरोखर वेदवाणी सांगणारा कोणीच शिल्लक राहिला नाही, म्हणून ती सर्वस्वी बुडून गेली. चालू कल्पाच्या आरंभाला तीच वेदवाणी मी ब्रह्मदेवाजवळ प्रगट केली, जिच्यामध्ये मी माझ्या भक्तीचे वर्णन यथार्थ रीतीने केले आहे. माझ्या स्वरूपातच समाधान पावणारे आत्मज्ञान, मी ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवाने ते आपला ज्ये÷ पुत्र स्वायंभुव मनू याला सांगितले. नंतर त्याच्याकडून भृगू इत्यादी सात ब्राह्मर्षींनी तिचे ग्रहण केले. ब्रह्मदेवाने दक्षादि प्रजापतीनाही त्याच रीतीने उपदेश केला. मग त्यांच्यापासून कितीजणांना ती ज्ञानसंपत्ती प्राप्त झाली, त्यांची संख्या सांगता येणे शक्मय नाही. प्रथम सात महर्षींकडून त्यांचे पुत्र देव, दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस, किंपुरूष इत्यादी अनेकजणांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून घेतले. यांपैकी काही सात्त्वीक, काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते. त्यांना परंपरेने उपदेश प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या समजुतीप्रमाणे ते ज्ञान सांगत असतात. स्वभाववैचित्र्यामुळे देव, असुर, मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार वेगवेगळय़ा झालेल्या बुद्धीप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे केले गेले.
क्रमशः