(अध्याय पाचवा)
अभक्तांची काय गती होते हे जाणून घेतल्यावर राजाला अतिशय वाईट वाटले तो कंटाळला आणि हरी स्मरण करू लागला. नंतर त्याने विनंती केली की, ‘ज्याच्या स्मरणाने कर्म अकर्म निर्माण होऊ शकत नाही त्या भगवंताची कथा आता मला सांगा.’ चमसाचे धाकटे बंधू करभाजन पुढे येऊन सांगू लागले. ‘कृत, त्रेता आणि द्वापर युगामध्ये भक्त हे नाना वर्णानी, नाना आकारांनी, नाना नामानी व अनेक प्रकारच्या उपचारांनी केशवाचे यजन करत असत. तो युगाप्रमाणे भिन्न भिन्न नामरूप धारण करतो. त्यावर जनक महाराज म्हणाले, मला याबाबतीत सविस्तर सांगा
त्यावर चमसमुनी म्हणाले, राजा तू बोलतो आहेस ते अगदी बरोबर आहे. प्रत्येक युगात ईश्वराचे सगुण रूप वेगवेगळे असून त्या त्या काळचे लोक निरनिराळय़ा प्रकाराने ईश्वराच्या सगुण रूपाची म्हणजे अवताराची पूजा करत असत. ते मी सर्व सविस्तर सांगतो. ऐक, कृतयुगात गौरवर्ण, जटाधारी चतुर्भुज, वल्कले नेसलेला, हातात दंड कमंडलू धारण करणारा, मृगचर्म, यज्ञोपवित, हातात रुद्राक्षाची माळ, कडक ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणारा अशा मूर्तिमंत परमात्म्याचे कृतायुगातील भक्त पूजन करायचे. त्या काळातील लोक शांत, निरवैर, समत्व बुद्धीने वागणारे, परस्परांवर निरपेक्ष प्रेम करणारे होते. हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म योगेश्वर, अमळ, वरिष्ठ, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा या दहा नावांनी ते परमात्म्याचे स्मरण करत असत. त्रेतायुगामध्ये पुरुषोत्तम हा यज्ञमूर्ती स्वरूपात असतो. त्याचा वर्ण अग्नीच्या ज्वालेसमान लालभडक, केस पिंगट असून त्याला चार हात असतात. त्या काळातील लोक तीन वेदांनी नारायणाचे भजन करत. हे लोक वेद वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवणारे आणि भजनशील असून धर्मनि÷ होते. ते विष्णू, यज्ञ, पुष्निगर्भ, सर्वदेव, उरुक्रम, वृषाकपी, जयंत, उरुगाय या श्रेष्ठ नामानी त्याचे स्मरण करतात. द्वापार युगात मेघासारखी निलंकाती, जवसाच्या फुलासारखा अंगाचा रंग, पितांबर परिधान केलेला तसेच श्रीवत्स चिन्हाने विराजमान, चारी हातात शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे घेतलेला अशा लक्षणांनी युक्त असलेल्या गोविंदाचे, भक्त सदा चिंतन करतात. लोक अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात. विविध नामाने त्यांचे नित्य स्मरण करतात. नामाच्या घोषाने देवाला परमसंतोष होतो आणि तो अकस्मात वैकुंठ सोडून त्या नामसंकीर्तनामध्ये त्वरेने धाव घेतो. कलियुगात श्रीकृष्ण हाच देव होय. त्याचा कृष्णवर्ण असतो. त्याची प्रभा इंद्रनील मण्याप्रमाणे सर्वत्र प्रकाशमान होत असते. त्याची मूर्ती परिपूर्ण असून चारही हातात
शंखचक्रादी सर्वांगसुंदर अशी आयुधे शोभतात. याला कीर्तन फार आवडते. तो कीर्तन हीच त्याची महापूजा समजतो. साहजिकच तो नारदांना फार मान देतो. निस्वार्थ प्रेमाने हरिकीर्तन केले असता हृदयामध्ये श्रीहरी प्रकट होतो. हरिस्मरणापुढे ध्यान, लक्षण, समाधी इत्यादी सर्व फिके पडते. अशा पद्धतीने कृत युगापासून कलियुगापर्यंत नाम, रूप, अवतारांची माहिती राजाला मिळाली. आता पुढे करभाजन कलियुगाची महती सांगणार आहेत ती आपण उद्या पाहू क्रमशः