नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशात राम मंदिरावरून एकीकडे वाद सुरु असताना दुसरीकडे जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah Former Chief minister of J&K) यांनी शनिवारी बोलताना आपल्या भाषणात प्रभू श्रीराम यांचा उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याने सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी प्रभू श्रीराम (prabhu shree ram) हे फक्त हिंदूंचेच नसून संपूर्ण जगाचे असल्याचं म्हटलं.
फारुख अब्दुल्ला यांनी “प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहेत. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, जणू प्रभू राम फक्त त्यांच्यासाठीच आहे आणि इतर कोणासाठीही नाही. प्रभू राम हे फक्त भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच (RSS) नाही तर संपूर्ण जगाचे आहेत, असे अब्दुल्ला यावेळी म्हणाले. त्यांनी यावेळी बोलताना शेजारच्या देशांशी मैत्री करण्यावर भर दिला. तसेच कलम ३७० रद्द केल्याबद्दल त्यांनी भाजपला फटकारले.
दिवंगत उपपंतप्रधान देवीलाल (former deputy prime minister devi lal) यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त समारोहाला संबोधित करताना, हरियाणातील (Haryana) जिंद येथे इंडियन नॅशनल लोक दल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या दोन वर्षानंतरही एकाही व्यक्तीला नोकरी मिळाली नाही. केंद्राने काश्मीरमध्ये ५० हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, तसं काहीच झालेलं नाही. त्यांनी भाजपावर केवळ धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा आणि खोटे बोलण्याचा आरोप केला.
“काश्मीर (Kashmir) भारताचा भाग कधी नव्हता? आम्ही गांधींचा भारत निवडला, जिनांचा पाकिस्तान नाही. आम्ही म्हणालो की, आम्ही भारतात राहू आणि आम्ही भारतातच मरणार. जे लोक कलम ३७० रद्द करून भारताला बळकट केल्याचा दावा केला आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी भारताला कमकुवत केले आहे. ते लोक सर्वांशी खोटे बोलते. त्यामुळे त्यांना त्यांचे मार्ग बदलावे लागतील,” असंही अब्दुल्ला म्हणाले.