डिसेंबरमध्ये भरती 14 टक्के वाढली : आयटी, टेक कंपन्या आघाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 मध्ये डिसेंबरचा महिना हा रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरला. कोरोनाचा परिणाम कमी झाल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल. डिसेंबरमध्ये रोजगार भरतीत 14 टक्के इतकी वाढ झाली आहे.
ऑटो, विमा व सहकारी क्षेत्रामध्ये भरतीचे प्रमाण वाढले आहे. नोकरी डॉट कॉमच्या मते डिसेंबरमध्ये 14 टक्के इतकी वाढ भरतीत दिसली आहे. नोकरी डॉट कॉमच्या मते 2020 हे वर्ष विविध उद्योगांसाठी आव्हानाचे ठरले. अनंत अडचणींना कारखाने, उद्योगांना तोंड द्यावे लागले. एप्रिल, मे व जून 2020 मध्ये मागच्या वर्षाच्या (2019) तुलनेत 56 टक्के भरती कमी दिसून आली होती. पण नंतरच्या काळात भरतीत सुधारणा दिसल्या. ऑगस्ट, सप्टेंबरनंतर अनेक उद्योग, कारखाने सुरू झाल्याने भरतीनेही वेग घेण्यास सुरूवात केली. येणाऱया काळात भरतीत आणखी वाढ होऊ शकते. विमा क्षेत्राने भरतीत वाढ करण्यात आघाडी घेतली होती. कोरोनामुळे अनेकांनी आरोग्य विमा घेण्यावर भर दिला. वर्षाच्या (2020) शेवटी ऑटो, सहाय्यक क्षेत्रे, बँकिंग, वित्तीय सेवा, फार्मास्युटिकल्स, एफएमसीजी व आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात सकारात्मक संकेत दिसू लागले आहेत.
टेक कंपन्यांमध्ये भरती वाढली
जगभरात आयटी व टेक कंपन्यांच्या नोकर भरतीत उत्साहवर्धक वाढ दिसली असून भारतातही हाच ट्रेंड दिसतो आहे. टेक कंपन्यांनी डिसेंबरमध्ये भरतीत वाढ केली आहे. मागच्या महिन्यात 22 हजार 200 जणांना टेक कंपन्यांनी नोकरी दिली आहे.
अमेरिकेत गेल्या महिन्यात 3 लाख 91 हजार जणांना आयटी क्षेत्रात सामावून घेतलं आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या महिन्यात 22 हजार 200 जणांना टेक कंपन्यांनी नोकरी देऊ केली आहे. सर्व क्षेत्रातील कंपन्यांनी डिसेंबरमध्ये 1 लाख 40 हजार जणांना कमी केल्याचीही माहिती आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱयांना कोरोनाकाळात चांगली मागणी दिसून आली आहे.
दोन महिन्यात 80 हजार जणांची भरती
वर्ष 2020 च्या नोव्हेंबर व डिसेंबरच्या काळात आयटी सेवा उद्योगाने जवळपास 81 हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. टेक सेवा देणाऱया कंपन्यांनीही मोठय़ा प्रमाणात पात्र उमेदवारांची भरती करून घेण्यावर भर दिला होता. आघाडीवरच्या 5 टेक कंपन्यांनी उच्च शिक्षीत कुशल कर्मचाऱयांची भरती करण्यावर अधिकाधिक भर दिला होता, असेही कळते. नव्या डिजिटल तंत्रज्ञानाने युक्त सेवांची वाढती गरज लक्षात घेऊन कंपन्यांनी नव्याने उमेदवारांची भरती केली आहे. गेल्या दोन महिन्यात भरतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.