चिरेबंदी शेतघराचे 2 लाख 32 हजार रूपयांचे नुकसान
वार्ताहर/ पाचल
राजापूर तालुक्यातील परूळे भावका देवीचा माळ येथे भरदुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये मोहन शंकर सावंत या शेतकऱयाचे शेतघर जळून खाक झाले. यामध्ये त्यांच्या पक्क्या चिरेबंदी शेतघराचे 2 लाख 32 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचयादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच शेतघरासह शेतीसाठी लागणारी अवजारे व बि-बियाणे जळून खाक झाल्याने मोहन सावंत यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या घटनेचे वृत्त कळताच गावचे सरपंच, पोलीस पाटील व आमदार राजन साळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तूस्थितीची पाहणी केली. मोहन सावंत यांचे शेतघर त्यांच्या घरापासून काही अंतरावर दूर होते. भरदुपारी आगीचे लोट व धूर येऊ लागल्याने काही ग्रामस्थांनी पाहिले व याची माहिती सावंत यांना दिली. मोहन सावंत व काही ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, दुपारची वेळ असल्याने ग्रामस्थांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर काही क्षणातच घराची राखरांगोळी झाली.
या घटनेनंतर गावचे तलाठी, पोलीस पाटील व सरपंच यांनी नुकसानीची पाहणी करून पंचयादी घातली. या पंचयादीमध्ये 2 लाख 32 हजार नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले असून ही पंचयादी तहसीलदार यांना पाठवण्यात आली आहे. या शेतकऱयाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार राजन साळवी व परिसरातील शेतकऱयांनी केली आहे.