ऑनलाईन टीम/तरुण भारत
कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते के एस ईश्वरप्पा यांनी गुरुवारी विधानसभेत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन भविष्यात आरएसएससोबत जोडले जातील असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी सभागृहात ‘आमचा आरएसएस’ शब्द वापरला आणि काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांना तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला आरएसएसला ‘आपली आरएसएस’ म्हणून मान्यता द्यावी लागेल असं म्हटलं. यावर काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर नेते के एस ईश्वरप्पा यांनी हे विधान केलं.
दरम्यान, ईश्वरप्पा यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी परखडपणे टीका केलीय. काँग्रेस नेते म्हणाले, माझा आरएसएसला पूर्णपणे विरोध आहे. कारण, त्यांच्यामुळेच या देशात ‘मनुवाद’ प्रस्थापित होत आहे. भाजप म्हणत आहे, तो दिवस कधीच येणार नाहीय. त्यांनी फक्त त्या दिवसाची वाटच पाहत बसावी, असा टोला त्यांनी लगावलाय.