अलीकडेच पार पडलेली विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाला स्वतःची रणनीति तसेच धोरणे बदलायला भाग पाडणारी ठरली आहे. भाजपला पश्चिम बंगालमध्ये पराभव पत्करावा लागल्याने 2024 मध्ये केंद्रातील सत्ता राखण्यापासून भाजपला रोखणे विरोधी पक्षांना शक्य वाटू लागले आहे. तर भाजपच्या पराभवाचा दूरगामी प्रभाव देशांतर्गत राजकारणावर पडणार आहे. या पराभवामुळे केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांचा धडाका धोक्यात आला आहे. लेबर कोड, बचतठेवींवरील व्याजदर, कृषी सुधारणा कायद्यासंबंधी केंद्र सरकारने सरळ नव्हे तर आडमार्गाने माघारच घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
स्वतःच्या तरुणपणात जगतप्रकाश नड्डा उत्तम धावपटू आणि जलतरणपटू होते आणि बिहारची राजधानी पाटणा येथे ते लहानाचे मोठे झाले, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात ते सुवर्णपदकांचे मानकरी ठरायचे. खेळांमुळे आपल्याला लक्ष केंद्रीत करणे, सातत्य राखणे आणि धैर्यासह योग्य संधीची प्रतीक्षा करण्याची शिकवण मिळाल्याचे ते सांगतात. ही वैशिष्टय़े त्यांना स्वतःचे गृहराज्य हिमाचल प्रदेशात परतल्यावर उपयोगी ठरली. हिमाचल प्रदेशात ते राजकारणाशी जोडले गेले आणि भाजपचे आमदार म्हणून निवडून आले.
मोदींशी जुना राजकीय संबंध
1998 मध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यावर त्यांना बाजूला सारून मुख्यमंत्रिपद प्रेमकुमार धुमल यांना देण्यात आले. तेव्हा या निर्णयामागे भाजपचे तत्कालीन महासचिव नरेंद्र मोदी यांची मोठी भूमिका होती. भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी नड्डा यांनी मोदींसोबत काम पेले होते. मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तरीही नड्डा यांनी कुठलीच कटूता किंवा नाराजी व्यक्त केली नाही. एवढेच नाही तर धूमल यांच्या मंत्रिमंडळात सामील होत त्यांनी पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही. नड्डा यांची सकारात्मकता आणि परिपक्वतेने मोदी प्रभावित झाले नसते तर नवलच होते.
20 वर्षांनी मिळाले फळ
20 वर्षांनी मोदींनी नड्डा यांना त्यांच्या धैर्य आणि शांत चित्तासाठी गौरविले आहे. जानेवारी 2020 मध्ये अमित शाह यांचा उत्तराधिकारी म्हणून भाजप अध्यक्षाचे पद या हिमाचली नेत्याला सोपविण्यात आले. मोदी आणि शाह यांनी तोपर्यंत भाजपला 15 कोटींहून अधिक सदस्यांसह जगातील सर्वात मोठय़ा पक्षाचा मान मिळवून दिला होता. दोन्ही नेत्यांनी 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एका मागोमाग एक पक्षाला प्रचंड बहुमतात विजयी करण्याची कामगिरी करून दाखविली आहे. एवढेच नाही तर 2018 पर्यंत देशातील 70 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱया 21 राज्यांमध्ये भाजपने एक तर सरकार स्थापन केले होते किंवा सरकारमध्ये सामील होता. यात उत्तरप्रदेशात जबरदस्त बहुमत प्राप्त करणेही सामील आहे. या राज्यात भाजप 15 वर्षांनी सत्तेवर परतला होता.
भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू
नड्डा आता अशा विशाल राजकीय संघटनेचे सीईओ आहेत, जिने अत्यंत कमी काळात ‘हिंदी, हिंदू, हिंदुस्थान’ प्रतिमेपासून मुक्तता मिळविली आहे. भाजप आता भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून उदयास आला आहे. आता हा पक्ष अखिल भारतीय ठरत असून राष्ट्रीय राजकीय परिदृश्यात पूर्वी ज्याप्रकारे काँग्रेसचे वर्चस्व असायचे, तेच स्थान मिळविले आहे. भाजपला जबरदस्त निवडणूक शक्तीचे स्वरुप प्राप्त करून देण्यासह शाह यांनी अध्यक्ष म्हणून पक्षाच्या दुहेरी भूमिकेची कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजेच सरकार आणि लोकांदरम्यान पक्ष ओजस्वी सेतू ठरावा आणि त्याच फीडबॅकच्या आधारावर सरकारला कामकाजासाठी संदर्भ आणि दिशा प्रदान करण्याची भूमिका अवलंबिण्यात आली.
मोठी जबाबदारी अन् आव्हान
अनेक लोक नड्डा यांना मोदी आणि शाह यांचा रबरस्टॅम्प म्हणून पाहतात, जे या दोन्ही नेत्यांना पक्षावरील नियंत्रण कायम ठेवू देतील आणि एका टीकाकाराच्या शब्दांमध्ये ‘एमएचव्ही’ (हिज मास्टर्स व्हॉईस) असण्यापेक्षा अधिक काही नसतील. पण दुसऱया गटाचे मानणे आहे की पक्षाला स्थिर आणि निरंतर वेगाने पुढे नेण्यासाठीच नड्डा यांना पूर्ण संतुलन आणि ऊर्जा देण्यासाठी निवडण्यात आले आहे. नड्डा यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान अमित शाह यांच्या विराट कामगिरीनुरुप स्वतःला सिद्ध करण्याचे आहे. मोदी आणि शाह यांच्याकडून निर्मित विशाल राजकीय साम्राज्याला मजबुती देण्यासह पूर्व आणि दक्षिणेच्या राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
लिटमस टेस्ट
विधानसभा निवडणुका त्यांच्या आणि पक्षासाठी लिटमस टेस्ट ठरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी राबविलेल्या आर्थिक सुधारणांना पक्षाचे कॅडर तळागाळातून समर्थन पुरवेल, जेणेकरून नव्या कृषी कायद्यांप्रमाणे विरोधाच्या आगीत सापडू नये याची खातरजमा नड्डांना करावी लागत आहे. नड्डा स्वतःच्या प्रचंड जबाबदारींना घाबरणारे नाहीत. ते वादळादरम्यान शांत राहण्याच्या स्वतःच्या क्षमतेचे शेय स्वतःच्या खेळाच्या पार्श्वभूमीला देतात. जेव्हा आम्ही संघभावनेने काम करतो, तेव्हा चांगले परिणाम प्राप्त होतात. काही भागांमध्ये पक्षाकडे विस्ताराची संधी आहे. याचमुळे पक्षाचे कॅडर आणि संरचना मजबूत करण्यासाठी जोर लावत आहोत असे नड्डा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
चांगल्या कामगिरीची गरज
सार्वत्रिक निवडणुकीत मोठय़ा विजयानंतर मागील 2 वर्षांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी स्पष्टपणे काहीशी चांगली तर काहीशी खराब राहिली आहे. हा निकाल त्याच्या नेत्यांच्या वाढत्या चिंतेचा विषय आहे. 2018 मध्ये भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील सत्ता गमाविली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने झारखंडमधील सत्ता गमावली. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास अपयश आले, दिल्लीत नामुष्कीजनक पराभव झाला आणि हरियाणात सत्तेसाठी आघाडी करावी लागली. केवळ बिहारमध्ये भाजपने सहकारी पक्ष संजदपेक्षा अधिक जागा जिंकल्या. राज्यांच्या अलिकडच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या तुलनेत कमजोर कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षाची कामगिरी स्वतःच्या शिखरावर पोहोचल्यावर आता उतरणीला लागली आहे का? स्वतःच्या जबरदस्त प्रभावानंतरही राज्य निवडणुकांमध्ये भाजपसाठी मते खेचण्याच्या मोदींच्या क्षमतेला ओहोटी लागली आहे का?
बंगालमध्ये भाजपला निराशा
भाजपने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकरता जोरदार प्रयत्न केले होते विशेषकरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूलसमोर भाजपने मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला ममता दीदींची सत्ता हिरावता आली नाही. तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच एक राष्ट्रीय सत्तारुढ पक्षाने ममता बॅनर्जींच्या सत्तारुढ प्रादेशिक पक्षाच्या दशकभराच्या दीर्घ सत्तेला तीव्र आव्हान दिले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शाह यांनी चमत्कारिक यश मिळवून पहिल्यांदाच बंगालच्या 42 पैकी 18 जागा भाजपला जिंकून देण्याची कामगिरी करून दाखविली होती. तसेच ममतांना अत्यंत हतप्रभ करून सोडले होते. ममतांना सत्तेवरून हटविणे आणि बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन करण्यासाठी मोदी आणि शाह यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले होते तरीही ममतांनी राज्यावरील स्वतःचा प्रभाव दाखवून दिला आहे . पक्षाने 109 राष्ट्रीय नेत्यांना प्रचारात उतरविले होते.
कार्यपद्धतीवर अनेक सवाल
विधानसभा निवडणुकांच्या काळात निकाल पाहता भाजपला अनेक मुद्दय़ांवर स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे. भाजप संधिसाधू पक्ष ठरला आहे. जो कुठल्याही स्थितीत सत्ता प्राप्त करू पाहतो अशी धारणा वाढू लागली आहे. राज्यांमध्ये विरोधकांना धुळीस मिळवून आणि सत्तेवर कब्जा करण्यासाठी पक्षांतर घडविणे त्याच्या रणनीतीचा हिस्सा ठरले आहे. मध्यप्रदेशात भाजपने एका रात्रीत आमदारांच्या एका मोठय़ा गटाचे पक्षांतर घडवून आणत कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडविले होते. त्यापूर्वी कर्नाटकातही हेच घडले होते. पण याचा धडा महाराष्ट्रात सहकारी पक्ष शिवसेनेकडून मिळाला. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे.
विस्ताराची योजना
भाजप अध्यक्ष आता खूपच अधिक मजबूत पक्षाची धुरा सांभाळत आहेत. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासह पक्षाच्या निवडणूक रणनीतिची दिशा निश्चित करण्यासाठी नड्डा तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत, यात विस्तृत डाटा विश्लेषण देखील आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू तसेच पुड्डेचेरीत पक्षाचा विस्तार घडविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या राज्यांमध्ये एकूण 102 लोकसभा खासदार आहेत. या राज्यांमधील विजयामुळे भाजपचे राज्यसभेतील बळ वाढणार आहे.
मोदीनंतर कोण
इंदिरा गांधी यांच्या तोडीची लोकप्रियता मोदींनी मिळविल्यावर पक्षाचे भवितव्य त्यांच्या मते खेचण्याच्या क्षमतेवर बऱयाचअंशी अवलंबून आहे. पण मोदीनंतर कोण हा प्रश्न विचारण्यात येत आहे. मोदींशिवाय भाजप निवडणूक जिंकू शकत नाही का हा प्रश्नही उपस्थित होत आहे. स्वतःची वाढती लोकप्रियता आणि महत्त्वानंतरही शाह लोकप्रियतेप्रकरणी मोदींच्या जवळपास देखील नाहीत.
संघासोबत ताळमेळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत उत्तम ताळमेळ राखण्याच्या दृष्टीकोनातून नड्डा संघ प्रचारकांना पक्षाशी जोडत आहेत. याचमुळे भाजपने पहिल्यांदाच तीन प्रचारक व्ही. सतीश, सुदान सिंग आणि शिवप्रकाश यांना महासचिवपदावरून बढती देत उपाध्यक्ष केले आहे. तसेच महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. शिवप्रकाश यांना मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणासोबत पश्चिम बंगालसारख्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी करण्यात आले आहे. मोदी-शाह-नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सातत्याने विस्तार करत आहे. शाह कट्टर हिंदुत्वाचे समर्थक आहेत. तर मोदी मुद्दय़ांवर बारकाईने लक्ष देण्याचा मार्ग अवलंबितात. पण दोघेही अव्वल दर्जाचे व्युहनीतिकार आहेत. तर नड्डा यांचे काम रणनीति आणि योजनांना प्रभावीपणे साकारणे आणि पक्षाच्या कामकाजाची देखरेख करणे आहे. कठोर शिस्तप्रिय आणि आक्रमकपणे काम करविणाऱया शाह यांच्या तुलनेत नड्डा राजकीय संघर्ष कमी करण्यावर विश्वास ठेवतात.
– उमाकांत कुलकर्णी