भागवत म्हणजे भगवंतांचे स्वरूप दर्शविणारे शास्त्र. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. भागवतकथा अर्थात् ‘श्रीमद् भागवत महापुराण’ ही भगवंतांची वाङ्मयीन मूर्ति आहे. संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणाऱया अमृताचे नाव आहे श्रीमद्भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते. एवढी याची थोरवी आहे. याचे महत्त्व किती आहे हे पुढील प्रसंगातून कळेल. श्रीशुकदेव भागवत कथा राजा परीक्षिताला सांगणार आहेत हे देवांना कळल्यावर ते लगेच अमृतकुंभ घेऊन आले आणि श्रीशुकदेवांना म्हणाले हे अमृत परीक्षिताला द्या म्हणजे तूर्त त्याचा मृत्यू टळेल आणि त्याबदल्यात आम्हाला ही कथा द्या. शुकदेव म्हणाले, अमृताला भागवताच्या तोडीचे समजणे म्हणजे, काचेच्या तुकडय़ाची तुलना तुम्ही हिरे-माणिकांबरोबर केल्यासारखे आहे एवढे भागवताचे महत्त्व आहे. ज्याला समजले, उमजले तोच याचे प्राशन करणार. सांसारिक भोगात सुख शोधणारे, त्यातच गुरफटलेले यांना त्याचे महत्त्व कळणे कठीण आहे. ज्याने प्रेयसाचे फोलपण आणि श्रेयसाचे महत्त्व जाणले आहे, जो विरक्त झाला आहे तोच भागवतामृताचा स्वाद घेण्यास उत्सुक असणार. व्यसमुनींनी श्रीमदभागवत पुराणाची रचना केलेली आहे. यामध्ये भगवंतांच्या कृष्णावतारापर्यंत सर्व अवतारांचे सविस्तर वर्णन आलेले आहे. अर्थातच भगवंतांचे सर्व अवतार दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून भक्तांचे रक्षण करून, दुष्टांचा नाश करण्यासाठी झालेले आहेत. दुष्टांचा नाश करून भगवंतांनी धर्माची पुनःस्थापना प्रत्येक अवतारात केलेली आहे. ईश्वर भक्तांचा कैवारी असून भक्ती करणारे भक्त त्याला अत्यंत प्रिय असतात. हे सर्व भक्त अनन्य असून त्यांना धनदौलत, मानमरातब, सत्ता आदि कशाचीही गरज नसते. अगदी मोक्षसुद्धा त्यांना ईश्वरभक्तीपुढे फिका वाटत असतो. त्यांची निरपेक्ष भक्ती पाहून ईश्वर थक्क होतो व त्यांच्या ऋणाचे त्याला ओझे होते.
नारद, प्रल्हाद, ध्रुव, बळी, मारुती, शबरी, सुदामा, अर्जुन, अप्रुर, भीष्म, विदुर, उद्धव अशी कितीतरी भक्तांची नावे आपल्याला माहीत आहेत. तसेच अलीकडील ज्ञात असलेली संत मंडळी व त्यांचे शिष्य हेही थोर भक्त होऊन गेले. त्यापैकी भगवंतांच्या कृष्णावतारापर्यंत होऊन गेलेल्या श्रे÷ भक्तांच्या भक्तीच्या रसाळ कथा व ईश्वरांनी त्यांच्यासाठी अवतार घेऊन दाखवलेल्या लीला यांचे अत्यंत बहारदार वर्णन व्यासमुनींनी भागवतात केलेले आहे. भक्तिमार्ग हा अत्यंत श्रे÷ असून आचरण्याला ज्ञानमार्गापेक्षा सोपा आहे. ज्ञानमार्ग आचरण्यासाठी साधकाला पूर्वतयारी म्हणून मागील जन्मीच्या साधनेची गरज असते. त्या साधनेच्या बळावर त्याची लहानपणापासूनच सर्वसंगपरित्याग करून ज्ञानसाधना करण्याची मानसिकता झालेली असते आणि अशानाच त्यात यश मिळते. यात सर्व संसारिक आकर्षणाकडे मनापासून पाठ फिरवून साधना करायची असते. म्हणून गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवंत याबाबत सावध करताना म्हणतात, ज्याचे देहावर प्रेम आहे त्याला ज्ञानमार्गाने बोध घडणार नाही. संसारी जनांनी भक्तिमार्गाचे आचरण करावे. सर्व कर्मे निरपेक्षतेने करून मला अर्पण करावीत. माझ्यावर निरपेक्ष प्रेम करून माझी अनन्य भक्ती करावी. जे सतत माझे चिंतन करतील ते माझेच सगुण रूप होतील. अशा भक्तांना मी संसार सागरातून बाहेर काढून अलगद माझ्या लोकी घेऊन जातो व त्यांना अत्युच्य पद बहाल करतो.
भागवताच्या पहिल्या दहा स्कंधात व्यासमुनींनी वरीलप्रमाणे भक्ती केलेल्या भक्तांचे चरित्र व त्यांच्यासाठी ईश्वराने अवतार धारण करून केलेल्या लीला यांचे श्लोकबद्ध वर्णन केलेले आहे. भक्तीचे सामर्थ्य व ईश्वरीलीला पाहून आपण चकित होतो. अशी भक्ती करण्यासाठी मनाची कशी तयारी करावी लागते त्याचे वर्णन एकादश स्कंधात येते. ते सर्वांना नीट समजावे म्हणून नाथ महाराजांनी एकनाथी भागवत ही मराठीत प्रसिद्ध ग्रंथ रचना केली आहे. त्याचा आपण सविस्तर अभ्यास करत आहोत.
क्रमशः