’आप’ चे वाल्मिकी नाईक यांचा हल्लाबोल
प्रतिनिधी/ पणजी
बाबूश मोन्सेरात सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करून आम आदमी पक्षाने भाजपावर तोफ डागली आहे. मोन्सेरात दाम्पत्याची याचिका न्यायालयाने फेटाळल्या नंतर वाल्मिकी नाईक यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
पोलिसांवर हल्ला करणे हा गुन्हा सामान्य नाही. तो राज्यावरच हल्ला आहे आणि देशद्रोहाचा सर्वोच्च गुन्हा मानला पाहिजे. या प्रकरणाची कार्यकृती जलद करण्याच्या न्यायालयाच्या निर्देशांचे आपण स्वागत करतो, असे नाईक यांनी म्हटले आहे.
विद्यमान खासदार आणि आमदारांवरील फौजदारी खटले लवकर निकाली काढण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील त्यांच्या पहिल्याच भाषणात दिले होते, याची आठवण नाईक यांनी करून दिली आहे. परंतु आता गोव्यात त्यांचाच पक्ष अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देत आहे, ही खेदाची बाब असल्याचे सांगून नाईक यांनी टीका केली आहे.
राजकीय विरोधक, कार्यकर्ते आणि कलाकारांना लक्ष्य करण्यासाठी भाजप कालबाह्य देशद्रोह कायद्याचा वापर करते. परंतु गोव्यात पोलीस ठाण्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीला केवळ संरक्षणच देत नाही तर पुढील निवडणुकीसाठी सक्रियपणे त्यांचा प्रचारही करत आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यास केंद्रीय निवडणूक आयोगानेही ते जाहीर करावे, अशी सूचना करतानाच भाजप आता मोन्सेरात यांना पाठिशी घालत आहे, अशी टीका नाईक यांनी केली आहे.
गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला उमेदवार उभा करण्यासंबंधीची कारणे राजकीय पक्षांनी द्यावी लागतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केले होते. अशावेळी गंभीर गुन्हे असलेल्या बाबूश यांना उमेदवारी दिल्यास भाजप त्याचे समर्थन करण्यासाठी कोणती कारणे देईल?, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला असून भाजपला त्याचे स्पष्टीकरण द्यावेच लागेल, असे म्हटले आहे.