आसाममधील सभेत पंतप्रधानांची हमी
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडी घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात पुन्हा ‘कमळ’च फुलणार असल्याचा आशावाद व्यक्त करत भाजप आसामी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आसाममधील बोकाखाट येथे आयोजित भव्य प्रचारसभेला संबोधित करताना अनेक आश्वासनांचा वर्षाव केला. तसेच काँग्रेस हे ‘लूट इंजिन’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी जोर धरू लागल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्ष सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत. रविवारी पंतप्रधानांची भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपने आतापर्यंत स्वच्छतागृह, आरोग्य, गॅस, वीज हय़ा सुविधा पुरविल्याची स्पष्टोक्ती देत आता घराघरात पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे आश्वासन दिले. सर्वांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी प्रचारसभेत स्पष्ट केले.
काँग्रेस सरकारच्या काळात आसाममध्ये फारच बिकट परिस्थिती होती. मात्र, भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्यानंतर बरीच सुधारणा झालेली आहे. आता आणखी किमान पाच वर्षे सत्ता मिळाल्यास राज्याचा कायापालट करण्यात भाजप तसूभरही मागे हटणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच आसाममधील चहा उद्योग संपुष्टात आणण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
काँग्रेस नेतेही प्रचारात सक्रिय
भाजपकडून आसाममध्ये जोरदार प्रचार सुरू असतानाच काँग्रेस पक्षनेतेही प्रचारात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी जोरहाट येथील सभेला संबोधित करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आसाममधील महापूर, नागरिकत्व दुरुस्ती कायदा यासंबंधी सध्या एक चकार शब्द का काढला जात नाही, अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच भाजपकडून आश्वासन देण्यात आलेले 25 लाख रोजगार मिळाले का, सीएए लागू करणार नाही, असे म्हणणाऱया भाजपने सत्तेत येताच सीएएच्या हालचाली गतिमान केल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली.