नवीन मोटार वाहन कायदा स्थगितीचा आग्रह,मुख्यमंत्री, वाहतूकमंत्र्यांना कळविले स्पष्टपणे,प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
राज्य सरकारतर्फे येत्या 1 मे पासून लागू करण्यात येणार असलेला भरमसाठ दंडाची तरतूद असलेला नवीन मोटार वाहन कायदा स्थागित करण्याची मागणी करून भाजपने प्रमोद सावंत सरकारला घरचा अहेर दिला आहे. त्यातील दंडात्मक तरतूदी या जनतेला परवडणाऱया नाहीत आणि दंड वाढवला म्हणून वाहतुकीत शिस्त येईल किंवा येणार नाही, असेही नाही. सध्या कोरोनाच्या काळात हा कायदा नको असे स्पष्ट मत भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले.
सरकारने या कायद्याचा फेरविचार करावा असे सांगून सदर मागणी पक्षाने मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवली असून येत्या दोन दिवसात त्यावर फेरनिर्णय अपेक्षित आहे, असे तानावडे म्हणाले.
सर्वजण आर्थिक संकटात असताना हा कायदा नको
पणजीत काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे यांनी सांगितले की नवीन कायद्यातील दंडाची रक्कम बरीच मोठी असून ती कोणालाच परवडणारी नाही. एवढी रक्कम खिशात घेऊन सर्व वाहनचालक फिरतात असेही नाही. सध्या कोरोना काळात अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. अनेकांचा पगार कापण्यात आला असून उद्योग, धंदे संकटात असताना हा नवीन कायदा लागू करणे योग्य नव्हे, असे सांगून त्यांनी या कायद्यास विरोध केला आणि आक्षेपही घेतला आहे. पक्षाचे हे म्हणणे सरकारला कळवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यभरात भाजपचा स्थापना दिन उत्साहात
भारतीय जनता पक्षाचा स्थापन दिन राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील सुमारे 50,000 घरांवर भाजपचे ध्वज फडकले तर 19 ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण थेट प्रक्षेपित करण्यात आले आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सुमारे 1070 बुथवर झेंडा फडकावण्याचा कार्यक्रम करण्यात आला, अशी माहिती नातावडे यांनी दिली.
लसीकरणाबाबत भाजपतर्फे जागृती मोहीम राबविणार
येत्या 14 एप्रिलपर्यंत भाजपच्या सर्व बुथवर सेवाकार्य बजावण्याचे ठरवण्यात आले असून मास्क, सॅनिटायझरचे वितरण स्वच्छता अभियान असे कार्यक्रम होतील. 20 एप्रिलपर्यंत कोरोना लसीकरण्याची जागृती मोहीम भाजपतर्फे हाती घेण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावे म्हणून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तानावडे म्हणाले. सर्व पक्षीयांनी लसीकरणासाठी सहकार्य देण्याची गरज असून त्यात कोणी राजकारण करू नये असे आवाहन नातावडे यांनी केले.
लसीकरणासाठी सर्वांनी स्वतःहून पुढे यावे
गोव्यात लसीकरणाचा प्रतिसाद कमी असून तो वाढवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्यात 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. कोरोनाला टक्कर देण्यासाठी लॉकडाऊन हा काही उपाय नव्हे तर लसीकरण होणे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी नमूद पेले. लसीकरणाबाबत अपप्रचार कोणी करू नये लोकांनी न घाबरता लसीकरणासाठी पुढे यावे, असेही ते म्हणाले.
सर्व पालिकांमध्ये भाजपचीच सत्ता येणार
येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱया 5 पालिकांच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी होतील आणि त्या सर्व 5 पालिकांवर भाजपची सत्ता येईल. शिवाय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशी दोन्ही पदे भाजप कार्यकर्त्यांनाच मिळतील असा दावा तानावडे यांनी केला.
मतदारसंघ हातून निसटणार म्हणून कामत, सरदेसाई एकत्र
मडगाव पालिका तसेच स्वतःचे विधानसभा मतदारसंघ हातातून निसटणार अशी भिती वाटत असल्यामुळेच मडगावात विजय सरदेसाई, दिगंबर कामत एकत्र आले आहेत. त्यांच्या युतीचा भाजपवर काहीच परिणाम होणार नाही. भाजप पुरस्कृत उमेदवारच बाजी मारतील, असेही तानावडे यांनी नमूद पेले.
एक वर्षाची स्थगिती देण्याची मागणी केंद्राकडे करणार : वाहतूकमंत्री
नवीन मोटार वाहन कायदा गोवा राज्यात लागू न करता त्यासाठी एक वर्षाची स्थगिती देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. तसे विनंतीपत्र केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयास पाठवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनाचे संकट संपेपर्यंत तरी हा कायदा नको असेही केंद्राला कळवण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडून हा कायदा स्थगित ठेवण्याची मागणी करण्यात आली असून त्यातील दंडाची रक्कम पेलण्याची ताकद जनतेमध्ये नसल्याचे त्यांनी नमूद केल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.