प्रतिनिधी/ मडगाव
पाच नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा असे आवाहन ‘एक पावल एकचारा’चे या संघटणेने केले आहे. भाजप सरकारला सत्तेचा माज चढला असून गोव्यातील सर्व सामान्य जनतेच्या भावनाची कदर केली जात नाही. भाजप सरकारने गोवा विक्रीला काढलेला आहे असा आरोप मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
मडगाव नगरपालिकेसाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी युती केली आहे. या युतीचे ‘एक पावल एकचारा’च्या तर्फे स्वागत केले जात आहे. अशा प्रकारे युती केली तरच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे शक्य होईल. एक पावल एकचाराच्या वतीने कुडचडे-काकोडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी पॅनल स्थापन केले होते. त्यात एक उमेदवार निवडून आला तर पाठिंबा दिलेले चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे मंत्री निलेश काब्राल यांना जबरदस्त दणका बसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भाजपने गोवा विक्रीला काढलेला आहे. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध असताना, जनतेच्या भावनाची कदर न करता दुपदरीकरण केले जात आहे. खनिज व्यवसाय नष्ट करून कोळशाची आयात केली जात आहे. मोले अभयारण्यात झाडाची कत्तल करून पर्यावरणाची हानी केली जात आहे. या ठिकाणी तीन प्रकल्प आणले जात आहे. म्हादई कर्नाटकला विकून टाकल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. भाजप सरकार बेफाम वागत आहे. त्याला रोखणे आवश्यक आहे व त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असून आगामी विधानसभेत सुद्धा अशाच प्रकारे युती होणे आवश्यक असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
‘एक पावल एकचारा’चे यांनी पुढाकार घेऊन 16 जानेवारी रोजी जनमत कौल दिनाचे औचित्य साधून मडगावच्या लोहिया मैदानावर जाहीर सभा घेतली होती व त्या सभेत सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा एक प्रयोग केला होता. त्याप्रमाणे भाजप सरकारच्या विरोधातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले होते. आत्ता पुन्हा एकदा पालिका निवडणुकीच्या माध्यमांतून एकत्र येण्याची वेळ आलेली आहे असे सांगण्यात आले.
आज गोव्याला निज गोयकारांचे म्हणणे ऐकून घेणारे सरकार गोव्याला हवे आहे. गोव्यातील भाजप सरकार केंद्रासमोर लोटांगण घालत असून केंद्रातून मिळणाऱया निधीवर सरकार चालविले जात आहे. त्यातून कमिशन कसे मिळणार याकडेच त्याचे अधिक लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
विजय सरदेसाई एनडीएचे घटक…
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व आमदार विजय सरदेसाई यांनी जरी युती केली तरी विजय सरदेसाई हे आजही एनडीएचे घटक असल्याचे प्रसार माध्यमांनी लक्षात आणून दिले असता, एक पावल एकचाराच्या प्रतिनिधींनी ते मान्य केले. ते योग्य वेळी एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.
एखाद्याने चूक केली तर त्याला ती सुधारण्यास संधी दिली पाहिजे. विजय सरदेसाई यांनी भाजपचे सरकार आणून चूक केलीच. परंतु अशी चूक ते पुन्हा करणार नाही तसेच स्वता ते या संदर्भात बोलत असतात असे एक पावल एकचाराचे प्रतिनिधी म्हणाले.
या पत्रकार परिषदेला श्री. भगत, ओलेन्सियो सिमोईश, शंकर पोलजी, क्रिसन आंताव, श्री. प्रेडी इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.