प्रतिनिधी/ पणजी
राज्यात सध्या आम आदमी पार्टी भाजपला पर्याय ठरू लागली आहे. त्यामुळे धास्तावलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सभेला मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी केला आहे. त्यासंबंधी शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी हा आरोप केला आहे.
आपने दि. 21 डिसेंबर रोजी गोव्यात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्या सभेत श्री. केजरीवाल उपस्थित राहणार आहे. सदर सभेला परवानगी मिळविण्यासाठी आपच्या गोवा शाखेने पाच दिवसांपूर्वी अर्ज केला होता. परंतु त्याला मान्यता न देता सदर फाईल अद्याप मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. यावरून प्रमोद सावंत केजरीवाल यांना घाबरतात हेच सिद्ध होते, असे आतिशी यांनी म्हटले आहे.
आपने दिल्लीत केलेला विकास हा संपूर्ण देशासाठी विकास मॉडेल ठरू लागला आहे. गोमंतकीयांनी या कार्याची दखल घेतली असून अधिकाधिक लोक आपकडे आकर्षित होऊ लागले. घरोघरी प्रचार, परीवर्तन यात्रा तसेच अनेक ठिकाणी महासभांना हजारोंच्या संख्येने लोकांची झालेली गर्दी पाहता येत्या निवडणुकीत आप हा मोठा पर्याय ठरणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजप धास्तावला आहे, असे आतिशी यांनी म्हटले आहे.
देशातील सर्वात मोठय़ा न्यूज चॅनलने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात गोव्यात काँग्रेस व भाजपने लोकांचा विश्वास गमावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोक नवा पर्याय शोधत असून लोक आम आदमी पक्षाकडे नव्या आशेने पाहू लागले आहेत. त्यातूनच गत 4 महिन्यात आपची लोकप्रियता कित्येक पटीनी वाढली आहे. दि. 13 डिसेंबर रोजी जारी केलेल्या सर्वेक्षण अहवालात आपच्या मतांच्या टक्केवारीत 2 टक्क्यांनी वाढ नोंद होत ती 24 टक्क्यांवर पोहोचली आहे. याऊलट भाजपच्या मतांची टक्केवारी 30 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे अतिशी यांनी म्हटले आहे.
यावरून येत्या निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यातच थेट सामना होणार आहे. एवढेच नव्हे तर गोव्यात प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत आपच्या मतदार टक्केवारी आणखी कित्येक पटींनी वाढ होण्याची शक्यता राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. हे सर्व चित्र पाहूनच भाजपने आपची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांच्या सभेस मान्यता टाळली जात आहे, असेही आतिशी यांनी म्हटले आहे.