प्रशांत किशोर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
प्रतिनिधी / पणजी
भाजप हा राष्ट्रीय पक्ष पुढील काही वर्षे सहजासहजी राजकारणातून दूर जाणार नाही, असे परखड मत निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. गोवा दौऱयावर असलेल्या किशोर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे. सध्याच्या राजकारणातील भाजपचे स्थान आणि काँग्रेसपुढील आव्हान यावर त्यांनी भाष्य केले.
भाजपला जनता लगेच दूर करेल असे राहुल गांधी यांना वाटत असले तरीही 30 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवणारा भाजप सहजासहजी राजकारणातून दूर जाणार नाही हे सत्य आहे. पुढील कित्येक दशके भाजपचे अस्तित्व कायम राहणार आहे, असे किशोर म्हणाले. मोदींचे सामर्थ्य काय आहे ते जोपर्यंत तुम्ही तपासत नाहीत, समजून घेत नाहीत आणि ओळखत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना पराभूत करण्याएवढे सक्षम होऊ शकत नाहीत, असेही किशोर म्हणाले.
काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाबाबतच्या चर्चेवर सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना किशोर यांनी, काँग्रेसच्या खोलवर रुजलेल्या समस्या आणि संघटनात्मक रचनेतील कमकुवतपणा यावर त्वरित उपाय नाही, असे सांगितले.
गोमंतकीय खुळे नाहीत ः काँग्रेस
दरम्यान, किशोर यांच्या सदरच्या वक्तव्याचा पुरेपूर राजकीय फायदा उठवताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एवढे दिवस आम्ही भाजप आणि तृणमूल यांच्यात मिलीभगत असल्याचे वारंवार सांगत होतो तेच सत्य ठरले असल्याचा दावा केला आहे.
गोव्यात मतविभागणी व्हावी आणि ती भाजपच्या पथ्थ्यावर पडावी हा छुपा अजेंडा घेऊनच तृणमूल गोव्यात दाखल झाली असून त्यामागील बोलाविता धनी कोण आहे, ते आता लपून राहिलेले नाही. हे लोक गोमंतकीयांना खुळे, मूर्ख समजतात, परंतु तो त्यांचा गैरसमज आहे. अशा लोकांपासून गोमंतकीयांनी सावध राहावे, असे आवाहनही चोडणकर यानी केले आहे.