मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अन्य कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्या शिवाय भाजप स्वबळावर सरकार घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे 22 पेक्षा जास्त उमेदवार विजयी होतील या आपल्या दाव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
भाजप उमेदवार, त्यांचे निवडणूक व खर्च निरीक्षक, मतदारसंघ प्रभारी, यांच्यासह दि. 10 रोजी होणाऱया मतमोजणीसाठी एजंट, यांच्यासाठी पणजीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
’तो’ दावा तथ्यहीन
काही विरोधी पक्ष 26 जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी त्यात काहीच खरेपणा नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले यावरून कुणी निकाल ठरवू शकत नाही. त्यासाठी आधी सत्यस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे कुणी कितीही दावे केले तरी 100 टक्के भाजपचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गोव्याच्या जनतेवर आपला पूर्ण विश्वास आहे. आपण स्वतः, पक्षाचे स्थानिक तसेच राष्ट्रीय ज्येष्ठ नेते, सर्व कार्यकर्ते यांनी ज्याप्रकारे निवडणूकपूर्व काम केले आहे त्या विश्वासावरच भाजपच्या विजयाचा दावा करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सांखळीत यंदा 3 टक्के मतदान कमी
2012 च्या निवडणुकीत सांखळीत 92 टक्के मतदान झाले होते. 2017 मध्ये 90 टक्के आणि यंदाच्या निवडणुकीत 89 टक्के मतदान झाले आहे. खरे तर यंदा 3 टक्के मतदान कमी झाले आहे. ही 3 टक्के मते विरोधकांनी गमावलेली आहेत. सांखळीत कित्येक बुथवर विरोधकांचे कार्यकर्तेच नव्हते. खास करून मगोचा एकही कार्यकर्ता कुठेच दिसला नाही. त्यावरून स्वतःच्या मतदारांना बुथपर्यंत आणण्यात ते अपयशी ठरले, हेच स्पष्ट होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधक मला पाडल्याचा दावा करत असले तरी कोण पडतो, कोण जिंकतो ते 10 मार्चलाच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंतच विरोधकांनी खोटा आनंद साजरा करावा, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आमचे काही उमेदवार पाच ते सहा हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होतील असा दावा केला आहे. त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या नावांचा त्यांनी उल्लेख केला. तसेच पणजीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे भाजप स्वबळावरच सरकार घडवणार याबद्दल ठाम खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक भागात मतदानाच्या रात्रीच विरोधकांनी फटाके, आतशबाजी वगैरे करून जल्लोष केल्याचे वृत्त होते, परंतु त्यांचा तो आनंद निकालानंतर मावळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आप, तृणमूल यांचा कोणताही प्रभाव नाही
आप, तृणमूल यासारखे अनेक नवीन पक्ष राज्यात दाखल झाले होते. परंतु भाजपवर ते कोणताही प्रभाव पाडू शकले नाहीत. अशावेळी जो पक्ष 26 जागा जिंकण्याचा व बहुमताचा दावा करत आहे, त्यांनी आधी त्या उमेदवारांची नावे जाहीर करावी, असे उघड आव्हान तानावडे यांनी दिले. केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आकडय़ांची गणीते मांडू नका असा सल्लाही त्यांनी दिला.
काँग्रेसने वास्तववादी दावे करावे : तानावडे
आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून 22 पेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याचा दावा करत आहोत कारण ते वास्तववादी आहे. काँग्रेसचे 26 जिंकणार असतील तर त्यांची नावे सांगावी. मांद्रे, पेडणेत त्यांचा उमेदवारच नाही. सत्तरीत तर डिपॉझिटही गमावण्याची शक्यता आहे, डिचोलीतही काँग्रेस नाही. त्यांना बार्देश व तिसवाडीत काही जागा मिळू शकतात. उत्तरेतील हे चित्र आहे. यावरून काँग्रेसचा दावा वास्तववादी नाही हेच स्पष्ट होते, असेही तानावडे यांनी सांगितले.