सावंतवाडी पालिकेसमोर ठिय्या : मंडईबाहेर बसलेल्यांना हटविले, मुख्याधिकारी कारवाईवर ठाम : पाच तास राहिले तणावाचे वातावरण
नगरविकास खात्याच्या ‘त्या’ पत्रावरून शिवसेना-भाजप आमनेसामने
कारवाईला चार महिने स्थगिती देऊ, नगराध्यक्षांची ग्वाही
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपालिकेने संत गाडगे महाराज मंडईबाहेर बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर बुधवारी केलेल्या कारवाईवरून सावंतवाडी पालिकेत पाच तास रणकंदन माजले. कारवाईच्या निषेधार्थ भाजी विपेत्यांनी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्याधिकाऱयांनी या विक्रेत्यांना बोलावून चर्चा केली. मुख्याधिकारी जयंत जावडेकर कारवाईवर ठाम राहिल्याने विक्रेते बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर पत्रकार परिषद सुरू असताना नगराध्यक्ष संजू परब यांना केबिनबाहेर झालेली कथित शिवीगाळ आणि त्यावरून परब यांनी मुख्याधिकाऱयांना दिलेले पोलीस कारवाईचे आदेश यामुळे वातावरण तंग बनले. त्यानंतर भाजी विप्रेत्यांसोबत झालेल्या बैठकीत नगरविकास खात्याकडून आलेल्या पत्रावरून नगराध्यक्ष परब आणि शिवसेना नगरसेवक तथा जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यात उडालेली खडाजंगी यामुळे वातावरण आणखी तापले. अखेर नगराध्यक्ष परब यांनी भाजी विपेत्यांशी चर्चा करीत मुख्याधिकारी मुंबईहून आल्यानंतर बैठक घेऊन चार महिने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण निवळले.
सावंतवाडी पालिकेच्या संत गाडगे महाराज मंडईबाहेर बसणाऱया विपेत्यांवर पालिकेने पावसाळय़ात कारवाई केली होती. त्यांना मंडईत जागा दिली होती. या कारवाईवरून मोठा गदारोळ झाला होता. नगराध्यक्ष संजू परब यांच्या आदेशानुसार कारवाई झाल्याचे सांगून शिवसेनेने परब यांना टार्गेट केले होते. भाजीपाला विपेत्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या कारवाईला विरोध केला होता. मात्र, ही कारवाई योग्य असल्याची भूमिका परब यांनी घेतली होती. मात्र, मंडईत व्यवसाय होत नसल्याने पूर्वी बाहेर व्यवसाय करणारे अधूनमधून बाहेर बसूनच व्यवसाय करीत होते. या विपेत्यांवर पालिका कारवाई करीत होती. परंतु दिवाळी आणि मार्गशीर्ष महिन्यात या विपेत्यांना बाहेर बसण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु जिमखाना मैदान येथील रवी जाधव यांचा दिवाळीत लावलेला स्टॉल पालिकेने हटविला. त्यावरून पुन्हा राजकारण तापले. ‘जाधव यांच्यावर पालिकेकडून अन्यायकारक कारवाई करण्यात आली. नगराध्यक्ष परब यांच्या आदेशाने ही कारवाई झाली’, असा आरोप करून शिवसेना आणि अन्य संघटनांनी पालिका आणि नगराध्यक्ष परब यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर रवी जाधव यांनी सहा दिवस या कारवाईविरोधात आणि स्टॉल पुन्हा मिळावा, यासाठी बेमुदत उपोषण केले. आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.
सकाळीच कारवाई हाती
केसरकर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जाधव यांची भेट घडवून आणली. नगरविकास खात्याने जाधव यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या मुद्याच्या आधारे आवश्यक नियमोचित कार्यवाही करण्याचे आदेश पालिकेला दिले. पालिकेने याबाबत कार्यवाही केलेली नसतानाच पालिकेने संत गाडगे महाराज मंडईबाहेर बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे सावंतवाडीत पुन्हा वातावरण तापले. भाजी विपेत्यांनी कारवाईच्या निषेधार्थ पालिकेसमोर सकाळी ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तासाच्या आंदोलनानंतर मुख्याधिकारी जावडेकर यांनी भाजी विक्रेत्यांना आपल्या केबिनमध्ये चर्चेसाठी बोलावले. परंतु त्यांनी काहीच मोजक्या विक्रेत्यांशी चर्चा सुरू केली. त्याला अन्य विक्रेत्यांनी आक्षेप घेतला. हा सर्वांचा प्रश्न असल्याने पालिका सभागृहात बैठक घ्या, असा आग्रह भाजी विपेत्यांनी धरला. त्यानंतर जावडेकर यांनी पालिकेच्या लोकमान्य सभागृहात बैठक घेतली. त्यांनी भाजी विपेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता आणि गटारावर अनधिकृत बांधकाम असल्यास ते हटविण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पुढेही ही कारवाई कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजी विपेते सभागृहातून बाहेर पडले.
नगरविकासच्या आदेशाने कारवाई
नगराध्यक्ष परब यांनी सांगितले की, आमदार दीपक केसरकर हे रवी जाधव यांना नगरविकासमंत्र्यांकडे घेऊन गेले. त्यामुळे नगरविकास खात्याने दिलेल्या पत्रानुसार ही कारवाई प्रशासनाने केली. त्यात आमचा संबंध नाही. तो प्रशासनाचा विषय आहे. मुख्याधिकाऱयांवर दबाव आहे. शिवसेनेने हा विषय चिघळवला. आता सर्वेक्षणात आढळलेल्या अनधिकृत स्टॉलधारकांच्या आम्ही पाठिशी राहू. त्यांचे पुनर्वसन करू, असे सांगितले.
कथित शिवीगाळ
नगराध्यक्षांची पत्रकार परिषद सुरू असतांना केबिनबाहेर नगराध्यक्ष परब यांना शिवीगाळ करण्यात आल्याचे कुणीतरी सांगितले. त्यामुळे नगराध्यक्ष परब संतप्त झाले. त्यांनी मुख्याधिकारी जावडेकर यांना बोलावून सर्वांना बाहेर घालवा. अन्यथा पोलीस आणून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तर परब यांचे सहकारी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, अमित परब, अजय गोंदावळे यांनी प्रकरण चिघळणार असल्यामुळे त्यांना शांत करण्याच्या प्रयत्न केला.
त्या पत्राबाबत नगराध्यक्षांकडून दिशाभूल
या दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर आले. परब यांनी भाजी विपेत्यांना सभागृहात चर्चा करू, असे सांगून तेथे नेले. तेथे बैठक सुरू झाली. परब यांनी नगरविकास मंत्र्यांकडून आलेल्या पत्रामुळे मुख्याधिकारी जावडेकर यांनी कारवाई केली, असे सांगितले. शिवसेनेवर नगराध्यक्ष परब आरोप करत असल्याचे लक्षात येताच डॉ. परुळेकर यांनी नगरविकास खात्याकडून आलेल्या पत्राचे वाचन केले. त्यात कुणावरही कारवाई करण्याचे आदेश नाहीत. नगराध्यक्ष परब भाजी विपेत्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. रवी जाधव यांना स्टॉल देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश असताना त्या पत्राबाबत परब गैरसमज पसरवित असल्याचे सांगितले. त्यावरून परब आणि डॉ. परुळेकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर याबाबत आपणास चर्चा करायची नाही, असे सांगून नगराध्यक्ष परब हे त्यांचे सहकारी नगरसेवक आनंद नेवगी, अमित परब, अजय गोंदावळे यांच्यासह सभागृहातून बाहेर पडले.
शिवसेना विक्रेत्यांच्या पाठिशी
डॉ. परुळेकर यांनी नगराध्यक्ष पळपुटे आहेत. त्यामुळे चर्चा न करता बाहेर पडले. शिवसेना भाजी विक्रेत्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देईल, असे आश्वासन दिले. यावेळी सभागृहात गोंधळ झाला. डॉ. परुळेकर यांच्या मदतीला माजी नगरसेवक संजय पेडणेकर धावून आले. डॉ. परुळेकर, पेडणेकर यांनी आम्ही मूळचे सावंतवाडीकर आहोत. आम्ही येथे भल्याभल्यांना मात दिली आहे. बाहेरून येऊन आम्हाला कुणी शिकवू नये, असा इशारा दिला.
डॉ. परुळेकरना ओळखत नाही!
हा गोंधळ सुरू असताना काही भाजी विपेते नगराध्यक्ष परब यांना भेटले. त्यांनी डॉ. परुळेकर यांना आम्ही बोलावले नव्हते. आम्हाला राजकारण नको. परुळेकर यांना ओळखतच नसल्याचे पत्रकारांना सांगितले.
मुख्याधिकाऱयांनी कारवाई केली – नगराध्यक्ष
नगराध्यक्ष परब यांनी नगरविकास खात्याकडून आलेल्या पत्रामुळे मुख्याधिकाऱयांनी कारवाई केली. मुख्याधिकाऱयांवर दबाव आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेण्यात आले. ते आल्यानंतर त्यांच्यासोबत बैठक घेऊन चार महिने कारवाईला स्थगिती देऊ, असे आश्वासन नगराध्यक्ष परब यांनी दिले. त्यामुळे वातावरण निवळले. मात्र, निरवडे येथील शेळके नामक महिलेने भाजी
विपेत्यांना खालच्या पातळीवर कशी वागणूक दिली जाते, याचा पाढाच वाचला.
व्यापाऱयांना भडकविण्याचा प्रयत्न -जाधव
‘नगरविकास मंत्र्यांनी नगरपालिकेला आदेश देत आपल्याला स्टॉल देण्याचे आदेश दिले. त्याचा राग येत नगराध्यक्ष संजू परब यांनी स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई करायला लावत ही कारवाई रवी जाधव यांच्यामुळे करावी लागत असल्याचे त्यांना सांगितले. विपेत्यांच्या बैठकीत सावंतवाडीशी संबंधित नसलेली व्यक्ती उपस्थित होती. त्यांनीही रवी जाधव यांच्यामुळे तुमचे स्टॉल काढावे लागत असल्याचे सांगत विक्रेत्यांना भडकावले. वास्तविक माझी लढाई ही माझा काढण्यात आलेला स्टॉल लावून मिळावा, यासाठी आहे आणि ती यापुढेही राहणार’, असे स्टॉलसाठी उपोषण पुकारणारे रवी जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले.
कारवाई यापुढेही होणार – मुख्याधिकारी
मुख्याधिकारी जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना कारवाईबाबत कोणतीही ढिलाई होणार नाही. त्या जागेवर कुणालाही बसू दिले जाणार नाही. कारवाईबाबत भाजीपाला विपेत्यांना कल्पना दिली होती. त्यानुसार कारवाई केली आहे. कारवाई कायम राहील, असे स्पष्ट केले. अतिक्रमणे हटविल्याने वाहनधारकांना वाहने पार्क करता येणार आहेत. तसेच आतपर्यंत वाहने नेता येणार आहेत. त्यामुळे आतमध्येही व्यापार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.