17 शेतकऱयांचे शेतीचे रापण आगीच्या भक्षस्थानी : 2 बागायतदारांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान,वीजवाहीन्यांच्या शॉर्टसर्कीटमुळे लागली आग?
प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यातील भातगाव येथे शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत दोन बागायती व शेतकऱयांनी भाजावळणीसाठी आणून ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत बागायतदारांचे सुमारे 2 लाख 50 हजार तर भाजावळीसाठी जमा केलेले सर्व शेतीची साहीत्य जळाल्याने शेतकऱयांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. वीज वाहीन्यांच्या शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. भातगावमध्ये शेतीच्या भाजावळीसाठी जमा करून ठेवलेले भारे, गवत आदी साहीत्य भाजावळ करण्याअगोदर जळून गेले आहे. तर मोहरास आलेली आंबा-काजू बागही जळली आहे. सुमारे 60 आंबा-काजुच्या झाडांचा सामावेश आहे. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता ही आग लागली. आग लागल्याचे समजताच रात्री उशीरापर्यंत आग विझवीण्याचा केलेल्या प्रयत्नामुळे पुढी बागायती वाचल्या. परंतु भातगाव व काजुर्ली गावातील एकूण 5 एकरपेक्षा जास्त भाग आगीमध्ये होरपळून निघाला आहे. सदर आग लागल्याची खबर मिळताच शनिवारी भातगावचे सरपंच सुशांत मुंडेकर, ग्रामसेवक रामसोबा पावरी, तलाठी श्री. कुळे, कृषी सहाय्यक श्री. शेलार, महावितरणचे वायरमन घटनास्थळी रवाना झाले. तलाठी, कृषी विभागाने बागायतीचा पंचनामा केला तर शेतीचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. सदर लागलेली आग ही येथून गेलेल्या वीज वाहीन्यांच्या शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु महावितरणचे वायरमन यांनी वीज वाहीन्यामुळे आग लागल्याचे नाकारले आहे. यामुळे आता ही आग कशामुळे लागली याचा शोध घ्यावा लागणार आहे.