बेळगाव :
भारतीयांची कला, कलात्मकता आणि संस्कृती देश-विदेशात पोहोचविण्याचा प्रयत्न ललित कला अकादमी करीत आहे. त्यासाठी वेगवेगळय़ा राज्यातील कलाकारांचे वर्कशॉप घेतले जातात. कला संमेलने घेतली जातात. भारतीय कला विशेषतः आदिवासी कला जोपासण्यासाठी खास प्रयत्न केले जातात. के. बी. कुलकर्णींसारख्या अभिजात कलाकारांची कला भारतभर आणि जगभर पोहोचण्यासाठी कला अकादमीतर्फे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांनी दिली. पाचारणे यांनी वरेरकर नाटय़ संघातील के. बी. कुलकर्णी कला दालनाला भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
केबींसारख्या महान पण दुर्लक्षित कलाकाराचे काम सर्वत्र पोहोचले पाहिजे. यासाठी ललित कला अकादमी के. बी. कुलकर्णी सरांच्या कलाकृतींवर आधारित एक 100 पानी पुस्तिका तयार करेल आणि ती भारतातील ललित कला अकादमीच्या सर्व शाखांमध्ये तसेच जगभराच्या महत्त्वाच्या कला दालनांमध्ये ठेवली जाईल. त्यासाठी लागेल ते सर्व साहित्य पुरविण्याची विनंती त्यांनी के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी समितीला केली. त्याचप्रमाणे या पुस्तिकेच्या संपादनाची जबाबदारी मुंबईचे प्रख्यात चित्रकार दत्ता पाडेकर यांच्याकडे सोपविली. त्यासाठी लागेल तो खर्चही करण्याची तयारी दर्शविली आहे.
तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळय़ाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना त्यांनी ललित कला अकादमीने भारतीयांची अभिजात कला टिकविण्यासाठी विविध राज्यात केलेल्या प्रयत्नांचा उहापोह केला. ओरिसा, बिहार व पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये अस्सल भारतीय कला टिकून आहे. महाराष्ट्र राज्य ललित कला अकादमीतर्फे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या रुपाने एक कलाकारच मुख्यमंत्री झाल्याने कलाकारांना चांगले दिवस यावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. कलाकारांचे मानधन व पारितोषिकांची रक्कम वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रपती भवन व अन्य सरकारी आस्थापनात उत्तमोत्तम कलाकृती लावून कलेला प्रोत्साहन देण्याचे कार्य अकादमीतर्फे केले जात आहे, असे प्रतिपादन डॉ. पाचारणे यांनी केले.
यावेळी जन्मशताब्दी सोहळय़ाच्या तिसऱया दिवशी दिवसभर वीसहून अधिक चित्रकारांनी केलेल्या कामाचे प्रदर्शन मांडण्यात आले. डॉ. उत्तम पाचारणे यांच्या हस्ते या सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ज्ये÷ चित्रकार रवी परांजपे, मारुती पाटील, दत्ता पाडेकर, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य आणि असंख्य कलाप्रेमी संकल्पभूमी, जैतनमाळ येथे उपस्थित होते.
प्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार
हे प्रदर्शन रविवार दि. 9 पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.