वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या आणखी तीन स्पर्धकांनी विविध वजन गटात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 51 किलो वजनगटात भारताच्या विश्वामित्र चोंगथेमने तसेच 48 किलो गटात सुरेश विश्वनाथ आणि 57 किलो वजनगटात जयदीप रावतने अंतिम फेरीत स्थान मिळविले.
शुक्रवारी या स्पर्धेत पुरूषांच्या 51 किलो वजनगटातील उपांत्य लढतीत विश्व युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱया भारताच्या विश्वामित्र चोंगथेमने ताजिकस्तानच्या व्हॉनझोडाचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. 48 किलो गटातील उपांत्य लढतीत सुरेश विश्वनाथनने बहरीनच्या फदेल सय्यदचा 5-0 त्याचप्रमाणे 57 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत जयदीप रावतने किर्जिस्थानच्या मुरासबेकोव्हचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या विभागात भारताच्या लेशु यादव तसेच 75 किलो वजनगटात भारताच्या दीपकला उपांत्य लढतीत हार पत्करावी लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कझाकस्तानच्या शेईबिकोव्हाने लेशु यादववर 5-0 तर कझाकस्तानच्या बेकबेर्जेनने दीपकवर 4-1 अशी मात करत अंतिम फेरी गाठली.
सदर स्पर्धा कनिष्ठ आणि युवा पुरूष आणि महिलांच्या विभागात एकाचवेळी सुरू आहे. या स्पर्धेत भारताने पदकांची लयलूट करताना 35 पदके आतापर्यंत मिळविली आहेत. त्यापैकी युवा विभागात भारताने 20 पदकांची कमाई केली आहे. युवा विभागातील सुवर्णपदक विजेत्याला 6000 डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 3000 आणि कास्यपदक विजेत्याला 1500 डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. कनिष्ठ विभागात सुवर्णपदक विजेत्याला 4000 डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 2000 आणि कास्यपदक विजेत्याला 1000 डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे.